मुंबई : कलाकारांना योग्य वेळेत त्यांच्या कामाचे मानधन मिळत नाही असी तक्रार वारंवार मालिका, चित्रपट किंवा अन्य कलाकारांकडून केली जात आहे.. निर्मात्यांकडून मानधन न मिळाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अभिनेता शशांक केतकर याने उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. ठरलेल्या कामाचे, वेळेत पैसे मिळावे इतकी प्रत्येक कलाकारांची माफक अपेक्षा असते. असं त्याने यापुर्वी म्हटले होते. आता पुन्हा एकदा एका निर्मात्यानं त्याच्या चित्रपटाचे मानधन थकवल्याने शशांकने राग व्क्त करणारी पोस्ट समाज माध्यमावर केली आहे.
काय म्हणाला शशांक केतकर?
मला पुन्हा एकदा फसवणाऱ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला माझं काम झाल्यानंतर ठरलेले लाखो रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता अनेक महिने उलटून गेले आहेत. मी सतत पाठपुरावा करतोय, तरी या फसवणाऱ्या प्रोडक्शन हाऊसकडून मला प्रत्येकवेळी उडवा-उडवीची उत्तरं दिली जात आहेत. हा एक मराठी चित्रपट होता. इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय आणि मोठी नावं या चित्रपटात आहेत. त्यांना त्यांच्या कामाचे बऱ्यापैकी पैसे मिळाले आहेत. पण मी आणि याच टीममधल्या अनेकांना ठरलेल्या मानधनाच्या २० टक्केही रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही. याचे डिटेल्स आणि माझं आणि निर्मात्यांमध्ये झालेलं सभांषण मी लवकरच वेळ आली की मीडियासोबत शेअर करेन...असं शशांकनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शेवटी महत्वाचा प्रश्न उपस्थित करत तो असं म्हणाला आहे की, गमतीचा भाग हा असा आहे की एखाद्याकडे Acting skills नसतील तर त्याला आपण actor म्हणत नाही… मग ज्याच्या कडे पैसा नाही त्याला producer का म्हणतो."