मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा क्षेत्रात ४८ मुस्लिम नेत्याची नियुक्ती केली जाणार असून ते मोदी सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
बावनकुळे पुढे म्हणाले, आगामी निवडणुकीत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात भाजपला मत देणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच समाजात पंतप्रधान मोदींबद्दल आत्मियता असून समाजाने भारत यशस्वी होत असल्याचे पाहिले आहे, यामुळे मोदीजींनाच मते मिळतील, असेदेखील बावनकुळे यावेळी म्हणाले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर उद्यापासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार असून विधानसभाध्यक्ष हे उत्कृष्ठ वकील आहेत. ते मेरीटचे विद्यार्थी असून ते मेरीटवरच निकाल देतील. ते कोणतिही गटबाजी किवा कुणावरही अन्याय होणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी बावनकुळेंनी यावेळी केली. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमताने निर्णय झाला.
रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात सर्वोत्कृष्ठ काम केले असे सांगतानाच बावनकुळेंनी ठाकरेंचा समाचार घेतला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी स्टॅलीनचे वक्तव्य त्यांना मान्य आहे का? हे महाराष्ट्राला सांगावे, मान्य नसेल तर इंडिया आघाडी सोडणार का? इंडिया आघाडी सोडणार नसाल तर तुमचे हिंदुत्व बेगडी, तुष्टीकरण करणारे आहे, असा घणाघात बावनकुळेंनी उध्दव ठाकरेंवर केला.