तांत्रिक बाबींच्या पुर्ततेनंतर त्वरित कार्यवाही सुरू होणार
19-Aug-2023
Total Views | 55
अंबरनाथ : नव्याने विकसित होत असलेल्या सर्वोदयनगर परिसराला जाणवणाऱ्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन जलकुंभ बांधण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. यासाठी सुमारे साडे अठरा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
अंबरनाथच्या पश्चिमेला असलेल्या सर्वोदयनगर परिसराला पाणी टंचाई भेडसावते. सततच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दोन दललि क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र् जीवन प्राधिकरण खात्याचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांच्यासमवेत जलकुंभ उभारणार असलेल्या जागेची पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, तसेच शैलेश भोईर, माजी नगरसेविका मंदाकिनी भोर, पालिका अधिकारी सुनील जाधव उपस्थित होते. या कामासाठी साडे अठरा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अंबरनाथ शहराला भेडसावणाऱ्या पाणी समस्येबाबत नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती, अशी माहिती आमदार डॉ. किणीकर यांनी दिली. बदलापूर येथील बेलवली मुख्य संतुलन टाकीपासून सर्वोदयनगरच्या नियोजित जलकुंभापर्यत गुरुत्व वाहिनी टाकली जाणार असून सर्वोदयनगरमध्ये पंप हाऊस बांधणे आणि दोन दललि क्षमतेचा जलकुंभ बांधणे आदी कामांचा अंतर्भाव आहे.
आवश्यक ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकून पाणी समस्येवर तोडगा काढण्यात येणार आहे, यासाठी लागणाऱ्या काही तांत्रिक बाबी लवकरच पूर्ण केल्या जाणार आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच एमआयडीसीचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शहराच्या पाणीपुरवठ्याची वस्तुस्थिती मांडली. तसेच त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निश्चय केल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.
विधी मंडळात आमदार डॉ. किणीकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीनंतर वरिष्ठांकडून त्याबाबत आदेश आले आहेत. तांत्रिक बाबींची मंजुरी मिळताच काम वेगाने होईल. सर्वोदयनगरसह अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेची पाणी समस्या सुटू शकेल. दिवाळी अथवा डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांनी सांगितले.