नवी दिल्ली : केंद्रसरकारने गेल्या ९ वर्षांमध्ये देशातील तरुण वर्गास संधी उपलब्ध करून देणे आणि रोजगार निर्मितीचे धोरण ठेवले आहे. त्याचप्रमाणे नोकरी भर्तीप्रक्रियेतील घराणेशाहीसारख्या अनिष्ट प्रथांचेही उच्चाटन केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ७१ हजार जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.
‘सबका साथ, सबका विकास’ या उमेदीने सुरू झालेला प्रवास विकसित भारतासाठी कार्यरत आहे. आज सिक्कीमचा स्थापना दिवस असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. या ९ वर्षांमध्ये रोजगाराच्या शक्यता लक्षात घेऊन सरकारी धोरणे बनवण्यात आली. आधुनिक पायाभूत सुविधा, ग्रामीण भागाला प्रोत्साहन असो किंवा जीवनाच्या मूलभूत गरजांचा विस्तार या क्षेत्रातील उपक्रम असोत भारत सरकारचे प्रत्येक धोरण तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करत आहे. गेल्या 9 वर्षांत सरकारने भांडवली खर्च आणि मूलभूत सुविधांवर सुमारे ३४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातही भांडवली खर्चासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या रकमेमुळे नवीन महामार्ग, नवीन विमानतळे, नवीन रेल्वे मार्ग, पूल इत्यादी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. यामुळे देशात अनेक नवीन रोजगार निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
तंत्र भारताच्या इतिहासाचा विचार करता आज भारताचा वेग आणि व्याप्ती अभूतपूर्व असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, गेल्या ७ दशकातील २० हजार किमीच्या तुलनेत गेल्या ९ वर्षात ४० हजार किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचा संदर्भ देत, २०१४ पूर्वी केवळ ६०० मीटर मेट्रो मार्ग टाकण्यात आले होते तर आज अंदाजे ६ किमी मेट्रो रेल्वे मार्ग टाकले जात आहेत असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.