नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिरुअनंतपुरम आणि कासरगोड दरम्यानच्या केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी तिरुअनंतपुरम - कासरगोड वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली. त्यांनी गाडीतून प्रवास करणाऱ्या मुलांशी तसेच कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुअनंतपुरम येथे ३ हजार २०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन – पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये कोची वॉटर मेट्रोचे लोकार्पण, विविध रेल्वे प्रकल्प आणि तिरुवनंतपुरम येथील डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी यांचा समावेश आहे.
कठोर परिश्रम आणि विनयता ही केरळच्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी ओळख आहे, असे पंतप्रधानांनी केरळ मधील शिक्षण आणि जागरूकतेचा स्तर याविषयी बोलताना सांगितले. जागतिक परिस्थिती समजून घेण्यात केरळचे लोक सक्षम आहेत आणि कठीण परिस्थितीत ही भारत कशाप्रकारे विकासाचा चैतन्यदायी भूभाग म्हणून ओळखला जातो आणि भारताने दिलेले विकासाचे आश्वासन जगभरात कशाप्रकारे स्वीकारले गेले आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. जगाने भारतावर जो विश्वास ठेवला आहे, त्याचे श्रेय देशाच्या हितासाठी जलद आणि ठोस निर्णय घेणाऱ्या केंद्रातील निर्णायक सरकारला जाते, भारतातील पायाभूत सोयीसुविधांचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी केलेली अभूतपूर्व गुंतवणूक , युवकांच्या कौशल्यविकासाकरता केलेली गुंतवणूक आणि सुखकर जीवन आणि व्यवसायाला अनुकूल वातावरण निर्मिती यासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता, या गोष्टींना जाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
केरळमध्ये गेल्या 9 वर्षात झालेल्या रेल्वेच्या विकासावर प्रकाश टाकत, गेज रूपांतरण, दुहेरीकरण आणि रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण यासंदर्भात केलेल्या कामांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. बहुआयामी वाहतुक केन्द्र बनवण्याच्या उद्देशाने केरळमधील तीन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम आजपासून सुरु केल्याचे त्यांनी नमूद केले. “वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे, महत्वाकांक्षी भारताची ओळख आहे”, असे ते म्हणाले. अशाप्रकारच्या निम-जलद गाड्या सहजतेने चालवणे शक्य होत आहे त्यामागील आधारस्तंभ असलेल्या भारतातील बदलत्या रेल्वेजाळ्यावर त्यांनी प्रकाश टाकला.