जयपूर : “स्वातंत्र्यानंतर रेल्वेचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी झाला. सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग असलेल्या रेल्वेसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेलाही राजकारणाचा आखाडा बनवण्यात आले, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.पंतप्रधानांनी बुधवारी राजस्थानला ’वंदे भारत ट्रेन’ भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी अजमेर-दिल्ली कॅन्ट दरम्यान आधुनिक रेल्वे संचालनाला सुरुवात केली.
या वेळी पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेमध्ये राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप करत मागील सरकारचे नाव न घेता टीका केली. त्याचवेळी त्यांनी माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर जमीन घोटाळ्याबाबत निशाणाही साधला. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप लालू आणि त्यांच्या कुटुंबावर आहे.
काँग्रेसचं नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतरही भारताला रेल्वेचं मोठं जाळं मिळालं होतं. मात्र, रेल्वेच्या आधुनिकीकरणात नेहमीच राजकीय हितसंबंधांचा बोलबाला राहिला. राजकीय स्वार्थासाठी कोण रेल्वेमंत्री होणार आणि कोण नाही हे ठरलं. कुठल्या स्टेशनवर कोणती ट्रेन धावायची हे स्वार्थापोटी ठरवायचं. स्वार्थासाठी अर्थसंकल्पात फक्त घोषणाच करण्यात आल्या. मात्र, यातून जनतेला काहीच मिळालं नाही, असा आरोपही त्यांनी केला.२०१४ नंतर देशातील जनतेने स्थिर सरकार स्थापन केल्यानंतर या सर्व परिस्थितीत बदल येऊ लागले. आज भारतीय रेल्वेचं बदललेलं रुप पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
’लँड फॉर जॉब स्कॅम’
माजी रेल्वेमंत्री लालू यादव यांच्यावरही पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला. ते म्हणाले, ’रेल्वेच्या भरतीत राजकारण होतं, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, अशी स्थिती होती. मात्र, गोरगरिबांच्या जमिनी हिसकावून त्यांना रेल्वेत नोकरी देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. रेल्वे सुरक्षा, रेल्वे स्वच्छता या सर्व गोष्टींकडं दुर्लक्ष करण्यात आले.