नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत तुर्कीमधील भूकंपग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) शेवटचे पथक भारतात परतले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून याची माहिती दिली. ते म्हणाले, ९९ सदस्यीय पथकाने इस्केंडरन येथे ३० खाटांचे पूर्ण सुसज्ज फील्ड हॉस्पिटल यशस्वीरित्या स्थापित केले आहे आणि चालवले आहे. यामुळे आपत्तीग्रस्त तुर्कीस मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तुर्की आणि सिरियामध्ये ६ फेब्रुवारी रोजी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप आला होता. त्यामध्ये जवळपास ४५ हजार लोकांचा मृत्यू झाला तर दहा लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. या भयावह संकटाच्यावेळी तुर्की आणि सिरिया येथे सर्वप्रथम मदत पोहोचविणाऱ्यांमध्ये भारताचा समावेश होता.
दोन्ही देशांमध्ये पीडितांना मदत करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले. भारताने तुर्की आणि सीरियाला मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली आणि फिरते रुग्णालय चालवले. तुर्की आणि सीरियातील सर्वाधिक प्रभावित भागात भारतीय लष्कराचे अडीचशे सैनिक तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, सातत्याने भारतविरोधी भूमिका घेऊन पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या तुर्कीस संकटाच्या वेळी भारताने सर्वप्रथम मदत पाठवून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आपल्या धोरणाचा पुन्हा परिचय करून दिला होता.