संगणकाला ‘विचारक्षमता’ नसते, असे मानणार्यांचाही गट मोठा आहे. कितीही वेगवान, कार्यक्षम असले आणि सर्वगुणसंपन्न भासले तरी अखेरीस ते एक यंत्र आहे. पण, मागील आठवड्यात घडलेल्या गुन्ह्यांनी नैतिक तंत्रज्ञान हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यानिमित्ताने...
१९७०च्या दशकात संगणकांचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात सुरू झाला आणि गेल्या ५३ वर्षांत त्यांचे स्वरूप कसे आमूलाग्र बदलले, हे वेगळे सांगण्याची काहीच गरज नाही. १९७० मधल्या महासंगणकापेक्षाही जास्त वेगवान, कार्यक्षम आणि बहुआयामी रचनेची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आज अगदी स्वस्तातल्या मोबाईल फोनमध्येही आढळते. संगणकीय सूक्ष्मतंत्राचा प्रवेश प्रत्येक पैलूमध्ये झालेला आढळेल. किंबहुना, तो तसा असणे हेच आपण गृहीत धरू, इतक्या सहजपणे हा बदल होणार आहे. याला ‘इंटेलिजंट कॉम्प्युटिंग’ असे म्हटले जाते. यामुळे ज्या बाबींची आपण आता कल्पनाही करू शकत नाही, त्या या तंत्रसंगमातून सहज शक्य होणार आहेत. उदा. तुमचा हरवलेला चष्मा मोठ्या बेडरूममधल्या पलंगावरील उशीखाली आहे, हे सांगण्याचे कामही हे तंत्रज्ञान करेल किंवा आपण कार चालवत असाल, तर पुढे एक-दोन किलोमीटरवर वाहतूककोंडीची लक्षणे दिसू लागताच, प्रत्यक्ष कोंडी होऊन गाड्या थांबण्याआधीच गाडीतील ’जीपीएस’ यंत्रणा पर्यायी मार्ग शोधेल किंवा आपण मॉलमध्ये खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांपैकी कोणते ‘जंक फूड’ आहे आणि कोणते पदार्थ आरोग्यास हितकारक आहेत, याबाबतही संगणक क्षणार्धात सल्ला देईल.
संगणकाला ’विचारक्षमता’ नसते, असे मानणार्यांचाही गट मोठा आहे. कितीही वेगवान, कार्यक्षम असले आणि सर्वगुणसंपन्न भासले तरी अखेरीस ते एक यंत्र आहे. पण, मागील आठवड्यात घडलेल्या गुन्ह्यांनी नैतिक तंत्रज्ञान हा मुद्दा चर्चेत आला आहे. एखादी अनैतिक बाब कदाचित कायदेशीरही असू शकते. तसेच एका सामाजिक गटाला नैतिक वाटणारी बाब दुसर्या गटाला अनैतिक वाटू शकते. शेवटी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, तंत्रज्ञान हे सुर्यासारखे असते. एखादे फळ कापण्यासाठी किंवा एखाद्याचा खून करण्यासाठी तंत्राला वापरणारे मन, विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेत अनेक वेळा शाळकरी मुलांवर खुनी हल्ले झालेत. ते आतापर्यंत कुठल्यातरी हाडामासाच्या विकृत खुनी व्यक्तीने केलेत. पण, भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन व यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल व त्यावेळी खुनी कोण, हे ठरवणे अवघड असेल. आपण एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राम कोडला ‘पॅच’ करून कार्यशील करू शकतो. पण, प्रोग्रामरच्या मनाला कसे ‘पॅच’ करणार? माहिती-तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी; परंतु त्याबरोबरच विघातक, विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडविण्याची क्षमताही प्राप्त झाली.
या पार्श्वभूमीवर आता विकसित देशातील (अमेरिकेतील) विद्यापीठातील विचारवंत चिंतीत झाले आहेत. आगामी काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, यंत्रमानव (रोबोटिक्स) ’इंटरनेट ऑफ थिंग्स’ यांसारख्या तंत्रज्ञानामुळे जगाच्या भल्यासाठी अनेक क्रांतिकारी शोध व नवीन उत्पादने बनू शकतील व बनतीलही. पण, हेच सर्व तांत्रिक प्रवाह एखाद्या विकृत, गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडले, तर नाशही होऊ शकतो. याचमुळे एमआयटी, स्टॅनफर्ड, हार्वर्ड यांसारख्या प्रथितयश विद्यापीठात नैतिकता, नीतिमूल्य या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञान व उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. त्यामुळे काय बरोबर आहे व काय चूक आहे, या विचारसरणीवर परिणाम होईल, असा त्यांचा होरा आहे. हा प्रवाह काही वर्षांतच भारतीय शिक्षण पद्धतीमध्येही अंतर्भूत होईल. सायबर तंत्रज्ञानाद्वारे चालवले जाणारी अशी युद्धे आतापर्यंतच्या लढायांपेक्षा फार वेगळी असणार आहेत, कोणतीही प्रत्यक्ष सीमारेषा नसलेली आणि फार वेगाने पसरणारी.
संगणकीय प्रणालीमध्ये अनधिकृत शिरकाव सहजपणे होऊ नये, यासाठी सतत नवनवीन तंत्रे शोधून चोरावर मोर होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शास्त्रज्ञ आणि संबंधित विषयांच्या तज्ज्ञांना अधिक संशोधनासाठी प्रोत्साहित करणे. तसेच संशोधन आणि विकासासाठी (रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट) भक्कम निधी मिळवून देणे आवश्यक आहे. हे संशोधन म्हणजे भावी सायबर सुरक्षिततेसाठी केलेली गुंतवणूक मानली जावी. या संशोधनात फक्त माहिती-तंत्रज्ञानाच्या शाखाच नाही तर रसायनशास्त्र, औषधशास्त्र यांचाही समावेश करायला हवा. कारण, जैविक युद्धाच्या (बायोलॉजिकल वॉरफेअर) धोक्याची टांगती तलवार सर्वांवर आहेच.
डॉ. दीपक शिकारपूर
deepak@deepakshikarpur.com