ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. विजेत्या ग्रामपंचायतींना ६० हजारांपासून ते ५० लाखांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनसाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले असून, गावोगावी स्वच्छतेसंदर्भात स्पर्धा निर्माण व्हावी, म्हणून शासनातर्फे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवुन या स्पर्धेत भाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
६० हजारांपासून ते ५० लाखांपर्यंत बक्षिस
जिल्हा परिषद गटातील प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला ६० हजार रुपयांचे बक्षीस. जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला सहा लाख रुपये, द्वितीय ग्रामपंचायतीला चार लाख तर तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला तीन लाख बक्षिस मिळणार. विभागस्तरीय प्रथम क्रमांकाला १२ लाख, द्वितीय क्रमांकाला ९ लाख व तृतीय क्रमांकाला ७ लाख, राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला ५० लाख , द्वितीय क्रमांकाला ३५ लाख, तृतीय क्रमांकाला ३० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.