नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण खनिजे आणि व्यापार आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा केली.दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेअंतर्गत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्याशी चर्चा केली.
दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि सागरी क्षेत्रामध्ये जागरूकता यासाठी सहकार्य आणखी वाढवण्याचे महत्त्व उभय मंत्र्यांनी अधोरेखित केले. दोन्ही देशांनी ‘हायड्रोग्राफी’ सहकार्य आणि एअर-टू-एअर रिफ्युलिंगसाठी आवश्यक त्या सहकार्याच्या अंमलबजावणीची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली चर्चा आता पुढच्या टप्प्यात आहे.
दोन्ही देशांच्या सैन्याने कृत्रिम बुद्धिमत्ता, पाणबुडीविरोधी आणि ड्रोनविरोधी युद्धपद्धती आणि सायबर क्षेत्र यांसारख्या विशिष्ट, आधुनिक प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे,यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. संरक्षण उद्योग आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ केल्याने आधीच मजबूत असलेल्या संबंधांना चालना मिळेल, यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुचवले की, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि देखभाल आणि विमानाची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) यामध्ये सहकार्य करण्याच्या शक्यता अजमावता येतील.पाण्याखाली वापरण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये संयुक्त संशोधनासाठी सहकार्य करण्यावरही उभय मंत्र्यांनी चर्चा केली. तसेच संरक्षण स्टार्ट-अपमधील सहकार्यावर चर्चा केली. भारत-ऑस्ट्रेलियाची मजबूत संरक्षण भागीदारी केवळ दोन्ही देशांच्या परस्पर फायद्यासाठीच नाही, तर इंडो-पॅसिफिक म्हणजेच हिंद-प्रशांतच्या एकूण सुरक्षेसाठीही योग्य ठरेल, यावर उभय नेत्यांचे एकमत झाले.