मुंबई : इस्रायल आणि हमास कडून एकमेकांवर हल्ले सुरुच आहे. दुसरीकडे इतर देश हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायल आणि हमास संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. गाझा पट्टीवरून हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टी सील करण्यात आली होती. तसंच, तिथं इंधन, पाण्यासह इतर मानवतावादी साहित्यांचीही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा जगण्याची संघर्ष सुरू होता. अखेर, शनिवारी इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवड्यांनंतर खुली केली. त्यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा मदत सामुग्रीची वाहने गाझा पट्टीत दाखल झाली आहेत. आता भारतानेही गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांना मदत पाठवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत ट्वीट करत समाजमाध्यमांवर माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची ट्वीट वर म्हणाले की, पॅलेस्टाईन नागरिकांसाठी ६.५ टन वैद्यकीय साहित्य आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य IAF C-17 या विमानाने रवाना करण्यात आली आहेत. हे विमान इजिप्तच्या El-Arish या विमानतळावर पोहोचेल. औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने, तात्पुरत्या राहण्यासाठी तंबू, ताडपत्री, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू, जलशुद्धीकरण गोळ्यांसह विविध वस्तू पॅलेस्टाईन नागरिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.