गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने राज्यातील कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, नवनवीन संकल्पनांना जन्म देणारे ‘स्टार्टअप्स’ना, ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेला हा आढावा.
महाराष्ट्रातील प्रत्येक नोकरी इच्छुक उमेदवाराला रोजगार मिळवून देणे, युवक-युवती, महिला, विद्यार्थी यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, नवनवीन संकल्पनांना जन्म देणार्या ‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन आणि चालना देणे, उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून ‘आयटीआय’मधील अभ्यासक्रमांचे तसेच ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण करणे यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे.कुशल महाराष्ट्र आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत दि. ६ मे ते ६ जून या कालावधीत ’छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरां’चे आयोजन करण्यात आले. या करिअर शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवतींना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देण्यात आले, याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे.
विभागामार्फत त्याचबरोबर राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यां’चे आयोजन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी हजारो विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होत असून, नोकरीसाठी विविध कंपन्यांकडे मुलाखती देत आहेत. याशिवाय ‘महास्वयंम’ वेबपोर्टल आणि विभागाच्या इतर विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये एप्रिल २०२३ मध्ये १३ हजार, ८२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला. विभागाने (https://rojgar. mahaswayam.gov.in) हे वेबपोर्टल सुरू केले आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागाकडे तसेच ‘महास्वयंम’ वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख, ४ हजार, ८७ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे.
जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत २९० ऑनलाईन आणि ऑफलाईन विविध मेळावे घेण्यात आले असून, यामध्ये १ लाख, ४० हजार, ११० युवक-युवतींना रोजगार प्राप्त झाला आहे. आतापर्यंत विभागीय रोजगार मेळाव्यासाठी एक लाख रुपये, तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी ४० ते ६० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. २०२३ पासून मेळावे अधिक प्रभावीरित्या राबविण्यासाठी पाच लाख रुपयांची मर्यादा वाढविण्यात आली आहे.राज्यातील युवक-युवतींना रोजगाराची उपलब्धता व्हावी, यासाठी विभागामार्फत विविध १ हजार, १७५ नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारामार्फत राज्यातील ६ लाख, ८६ लाख युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
‘जागतिक बँके’च्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून विभागात विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक ‘मॉडेल आयटीआय’ आणि राज्यात मुलींसाठी १७ ‘मॉडेल आयटीआय’ असे एकूण ५३ ‘मॉडेल आयटीआय’ निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व सुविधायुक्त असे जागतिक स्किल सेंटर उभारण्यात येणार आहे. एकात्मिक कौशल्य भवन उभारण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून ’सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली.कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. विद्यापीठासाठी पनवेल येथे इमारत उभारण्यात येणार असून, नुकतेच त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. विद्यापीठ आणि ‘रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (आरएआय) यांच्यादरम्यान ‘बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ (बीबीए) या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बिझनेस आणि रिटेलचे आवश्यक ज्ञान आणि उद्योगाचा अनुभव मिळेल.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभाग कुशल कर्मचार्यांच्या वाढत्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि ‘आयटीआय’च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना परदेशातदेखील नोकर्या मिळत आहेत. यावर्षी राज्यातील ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना जपानमध्ये तीन आणि जर्मनीमध्ये ५५ अशा एकूण ५८ नोकर्या परदेशात मिळाल्या आहेत. परदेशात रोजगार प्राप्त करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत लाभ होणार आहे. राज्यात पाच ठिकाणी, हे सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.युवकांमधील नवनवीन संकल्पनांवर आधारित ‘स्टार्टअप्स’, ‘युनिकॉर्न्स’ यांना चालना देण्यात येत आहे. महाराष्ट्र ही देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ आहे. देशात नव्याने सुरू झालेल्या ४२ ‘युनिकॉर्न’पैकी ११ ‘युनिकॉर्न’ महाराष्ट्रातील आहेत. ‘स्टार्टअप’विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे (ऊझखखढ) मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण ८८ हजार, १३६ ‘स्टार्टअप्स’पैकी सर्वाधिक १६ हजार, २५० ‘स्टार्टअप्स’ (१८ टक्के) महाराष्ट्रातील आहेत.
राज्याचा २०२३-२४चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. ‘स्टार्टअप्स’ सुरू करण्याकरिता आवश्यक प्रशिक्षणासाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. गावांतून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबावे, यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन झाले. संपूर्ण राज्यातील ‘आयटीआय’मध्ये, अशा प्रकारच्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ भविष्यात असतील. या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’मध्ये इंटरअॅक्टिव्ह पॅनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ’स्किल इंडिया’ व ’डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत राज्यातील ४१९ या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण व ५४७ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.लहान मुलांमध्ये कौशल्य शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, म्हणून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून मुंबईतील २०० शाळांमध्ये प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येईल. कौशल्यवर्धनाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनविण्याकरिता पुढील तीन वर्षांत २ हजार, ३०७ कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ करण्यात येईल.
अर्थसंकल्पात चतुर्थ ‘अमृत रोजगार निर्मिती
सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा’ यासाठी कार्यक्रम खर्चाकरिता एकूण ११ हजार, ६५८ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील युवक, शेतकरी, महिला अशा सर्व घटकांना सामावून घेत, त्यांना कौशल्याबरोबरच शाश्वत रोजगार मिळण्याच्या अनुषंगाने राज्य शासन आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभाग कटिबद्ध आहे.
-मंगलप्रभात लोढा
(लेखक महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री आहेत.)
(शब्दांकन : संध्या गरवारे-खंडारे, साहाय्यक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय)