फडणवीस-शिंदे सरकारचा एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
कॅबिनेटच्या बैठकीत सकारत्मक निर्णयाचे आश्वासन
31-Jan-2023
Total Views | 87
14
पुणे : राज्य सेवा आयोग (एमपीएसी) परीक्षा पध्दतीत आयोगाकडून करण्यात आलेले बदल हे २०२३ एवजी २०२५ पासून लागू करावेत, या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलनास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला. कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय आम्ही करू असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या फोनवरील चर्चेत दिले.
पुण्यातील अलका टॉकिज चौकात या परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन छेडले. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार हे सहभागी झाले होते. यावेळी आ. पडळकरांनी फोन कॉलच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधला.
यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, यासंदर्भातील दळवी समिती मागच्या सरकारच्या काळात झाली होती आणि त्यांनीच हा निर्णय घेतला होता. आता सगळ्यांनी ही मागणी केली असल्याने मी स्वतः याबाबत बैठकीत बोलणार आहे. ही बैठक झाल्यानंतर यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री करतील. पण समजा सकारात्मक निर्णय केला तर आता २०२५ म्हणात आहात मग २०२७ म्हणाल असं करू नका. आपल्याला यूपीएसीच्या समकक्ष जाणं गरजेचं आहे असेही त्यांनी सांगितेले.
विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्ष पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात विद्यार्थी आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.