एक उत्कृष्ट कल्पनाविस्तार म्हणून रसिक चित्रपटाकडे दुर्लक्ष करतायेत. ऐतिहासिक चित्रपट इतिहास दाखवणारेचअसावेत असा बऱ्याचदा आपला अट्टाहास असतो. पण हा कल्पनाविस्तारच कथानकाला अप्रतिम बनवतो. कथानक थोडक्यात सांगते आणि मग चित्रपट का पाहावा याविषयी बोलू. गोडसेंचा गांधींना मारण्याचा प्रयत्न असफल होतो. पुढे गांधींच्या अहिंसा तत्वामुळे त्रासून लोक त्यांच्या विरोधी साक्षी देऊन त्यांना तुरुंगात पाठवतात. गोडसेंच्याच सेलमध्ये राहायचंय ही गांधींची मागणी मान्य होते. इथून संवादसेतू सांधला जातो. आणि मग शेवट अतिशय नाट्यमय रीतीने करून चित्रपटाला बाहेर आणली आहे.
आपल्याला समाजात २ परस्परविरोधी मानसिकतेची लोक पाहायला मिळतात. गांधीजी महात्मा होते आणि गोडसे खुनी होता म्हणणारी किंवा गोडसेंच्या प्रेमात पडलेली, एक माथेफिरू म्हणून तरीही त्याचं उदात्तीकरण करणारी. या घटनेकडे संविधानिक दृष्टिकोनातून तटस्थतेने पाहणारेही आहेत. तसेच या अतिमहत्वपूर्ण घटनेकडे दुर्लक्ष करणारेही काही आहेत. आपण इतिहासातील घटनांचा विचार करताना एक चूक करतो ती म्हणजे कोणा एकाने सांगितलेल्या, लिहिलेल्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे पाहतो. त्या त्या व्यक्तीच्या विचारसरणीकडे दुर्लक्ष करून निव्वळ तिनं घेतलेल्या निर्णयाकडे पाहतो. आणि मग गणित चुकत, मतभेद होतात आणि बरच काही होतं.
असो, चित्रपटात गांधींचे आणि गोडसेचे वैचारिक युद्ध दाखवलेले आहे. वैचारिक मतभेद आणि काळ यातला फरक असल्याने संवाद झाला नाहीच. या संवाद सेतूच्या अभावामुळे आपण एक नाही तर २ माणसांना मुकलो. यातून नुकसान हिंदुत्वाचा झालं, हिंदुस्थानचं झालं, संघावर याचा विपरिवत परिणाम झाला आणि हिंदुत्ववादी चळवळ कित्येक वर्षे मागे गेली. या चित्रपटातून आपण गांधींची विचारप्रणाली समजून घेतो आणि गोडसेचं म्हणणं समजून घेतो. मग कल्पनाविस्तार कसाही होवो, कितीही बाजूनी होवो, त्यात फरक पडत नाही.
27 January, 2023 | 15:59
चित्रपटात सांगितलेले गांधी कसे आहेत?
कुणाचंही न ऐकणारे. मनमानी करणारे. वर्तुळाबाहेर राहून परिघावर आपलं वर्चस्व राखणारे. आपल्या अहिंसा तत्वाने अनेकांना झुकवणारे. दुर्दम्य इच्छाशक्तीने संपूर्ण भारत एकत्र सांधणारे, राज्यकर्ते आणि विसृत हिंदुस्थानातल्या जनतेला एकत्र आणणारे. ग्रामीण भागात, खेड्यात खेडुतांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणारे. अंतर्गत सुस्थीती यावी मग बाह्य सरकारचा आणि त्यांचा उपयोगच शून्य व्हावा यासाठी झटणारे. स्वयंसेवक नसलेले परंतु त्यांच्यासारखंच वर्तन असणारे असे आहेत. गोडसे त्यांना म्हणतो, “तुम्ही ना सरकारला घाबरता, आणि जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना वरून घेता, स्त्रियांना दास्यात ठेवता आणि आपल्या माणसांवर हुकमत गाजवता.” यावेळी गांधी काय विचार करतात ते पाहण्यासारखे आहे.
27 January, 2023 | 16:0
बरं गोडसे काय आहे? कसा आहे?
देशप्रेमाने वेडा झालेला. खरंच माथेफिरू. भारत पूर्ण न पाहता भारतावर वेड्यासारखं प्रेम करणारा, आपल्या आपल्या चौकटीतून देशाकडे पाहणारा. एखादा चुकला तर आपल्या कठोर आणि धारधार शैलीतून आपला आपण न्याय देणारा. हिंदुस्थानासाठी, इथल्या माणसांसाठी जीवावर उदार होणारा. राजकारणी विचारप्रणालीपेक्षा सोशालिस्ट असा. मन असणारा. भावना जाणणारा.
चित्रपट वैचारिक सक्षमीकरणावर भाष्य करतो. प्रेक्षकांना विचारसक्षम करणं हे चित्रपटांचं सामाजिक उत्तरदायित्व असतं. त्यासाठी फक्त पाहण्यालायकच नाही तर आवर्जून पाहण्यासारखा आहे, असे सांगता येईल. बाकी चित्रीकरण आणि इतर तांत्रिक बाजू उत्तम आहेत. हेतूविषयी दुमत नाही पण इतिहास पाहण्यासाठी आलेल्या लोकांची मात्र निराशा होते हे खरंय. चित्रपटाचे विश्लेषण करण्यापेक्षा फक्त कथानक उलगडून दाखवल्याबद्दल क्षमा मागते. अर्थात शेवट गुलदस्त्यातच आहे. चित्रपट जरूर पहा.
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.