चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां विद्धयकर्तारमव्ययम्॥ ४.१३ ॥
गुण आणि कर्म विभागाने माझ्याद्वारे म्हणजे परमशुद्ध बुद्धीद्वारे चातुर्वर्ण्य रचले गेले आहेत. त्यांचा मी कर्ता असलो, तरी मी त्या कर्तृत्वाच्या वर असलेला परमात्मा आहे. चातुर्वर्ण्य ही एक प्राचीन समाजरचना आहे, जिचा वरील श्लोकाद्वारे गीतेत स्पष्ट उल्लेख आला आहे. वर्णव्यवस्था समजण्यासाठी प्रथम वर्णाचा वैदिक (ज्ञानमय) आशय जाणणे आवश्यक आहे. वर्ण म्हणजे त्वचेचा रंग नाही. प्रत्येक शरीरातील जीवात्म्याचे गुण म्हणजे वृत्तींना धरून एक प्रकारचे दिव्य वर्णवलय असते. जे व्यक्तीच्या गुण आणि कर्मानुसार शरीराबाहेर फेकले जाते. म्हणून जसे वलय तशीच त्याची वृत्ती असेल, पुष्कळवेळा माणसाची वृत्ती कळत नाही. परंतु, हे वर्णवलय पाहता आल्यास माणूस आपली वृत्ती, गुण आणि त्याला धरून तो जे कर्म करेल, ते लपवू शकणार नाही. या वर्णवलयाला इंग्रजीत ’ऑरा’ असे म्हणतात. काही वर्षांपूर्वी एका नव्या छायाचित्रणाचा शोध एका रशियन वैज्ञानिकाने लावला आहे.
त्या छायाचित्रणाचे नाव ‘किरलिअन छायाचित्रण’ (Kirlian Photography) आहे, ज्यामुळे शरीराभोवताली जो दिव्यप्रकाश (aura) असतो, त्याचे छायाचित्र घेणे शक्य झाले आहे. प्रत्येक शरीराभोवताली हे प्रकाशवलय (aura) असते. हे प्रकाशवलय झाडांभोवती तसेच झाडांच्या पानांभोवतीसुद्धा असते. मानव शरीराच्या बाबतीत या प्रकाशवलयाचा प्रभाव अधिक आणि परिपूर्ण दिसून येतो. विशेष करून मानवशरीराच्या डोक्याभोवती हे प्रकाशवलय अधिक व्यापक आणि दिव्य असते. ‘किरलिअन छायाचित्रणा’द्वारे शरीराची अनेक सूक्ष्म छायाचित्रे घेतली आहेत. स्वतः लेखकाने त्याचे सूक्ष्मतरंग चित्र (micro- wave photography) दिल्लीच्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनात पाहिले आहेत. एका व्यक्तीचा डावा हात सहा महिन्यांपूर्वी खांद्यापासून तुटला होता. त्याचे ‘किरलिअन छायाचित्रण’ घेतल्यानंतर त्याच्या तुटलेल्या हाताचे चित्र आले नाही. परंतु, त्या तुटलेल्या हाताच्या सभोवती पसरलेल्या प्रकाशवलयाचे प्रकाशचित्र स्पष्ट दिसत होते.
आता नसलेल्या हाताच्या प्रकाशवलयाचे ‘किरलिअन छायाचित्रण’ कसे आले? याचे वैज्ञानिकांना कोडे पडले आहे. अशा प्रकारे केवळ एक हात नाही, तर अनेक अवयव जरी नष्ट झाले, तरी या सूक्ष्म ‘किरलिअन छायाचित्रा’मध्ये मानवीशरीराभोवती संपूर्ण प्रकाशवलय अवश्य दिसेल. याप्रकाशमय अस्तित्वाला जीवात्मा म्हणतात, जो जड शरीर नष्ट झाल्यावरही कधीच नष्ट होत नाही. हाच जीवात्मा पूर्व शरीर नष्ट झाल्यावर मातेच्या गर्भात असलेल्या नव्या शरीरात सातव्या महिन्यात प्रवेश करतो. जीवात्मा आयुर्मर्यादा असेपर्यंत या नव्या शरीरात संचार करीत असतो आणि ते शरीर नष्ट झाल्यावर पुन्हा नव्या शरीराच्या शोधार्थ जातो. यासाठी जीवात्मा नावाची अवस्था मानावी लागते. मानवाच्या सर्व शरीराभोवताली हे वर्णवलय असते. आक्रमक व्यक्तीच्या बोटांच्या भोवताली चारही बाजूला रक्तवर्णी गोळे बाहेर पडताना पाहिले. काही पित वर्णाचे गोळेसुद्धा पाहिले आणि कृष्ण वर्णाचे सुद्धा पाहिले. शुक्ल रंगाचे दिसले नाहीत.
उच्च ध्यानरत योगसाधनेद्वारे हे व्यक्तीवर्ण अवश्य दिसू शकतील, जे सिद्ध करण्यासाठी आजच्या ‘किरलिअन’ छायाशास्त्राचा आधार घेता येईल. असे संशोधन व्हावे, अशी लेखकाची इच्छा आहे. चातुर्वर्ण्य समाजरचनेच्या काळात व्यक्तीच्या कातडीचा वर्ण नव्हे, तर वृत्तीद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या दिव्य वर्णवलयाचा उपयोग करून समाजरचना केली असेल, अशी लेखकाची अल्प अनुभवाद्वारे व चिंतनाद्वारे धारणा आहे. केवळ त्वचेच्या वर्णावरून आपल्या समाजाची पुनर्रचना करणारे प्राचीन वैदिक ऋषी नव्हते.
असली वर्णवलये वृत्तीनुसार अनेक असू शकतील. परंतु, त्या अनेक वर्णवलयांना चार मुख्य वर्णात विभागून तदनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्णविभाग प्रमुख मानले गेले. जे मनाने शुद्ध वसदा ब्रह्मज्ञानात रत असतात, त्यांचे प्रकाशवलय गुणवृत्तीनुसारशुक्ल म्हणजे चंद्रप्रकाशासारखे शुद्ध असते, असे त्या वैदिक ऋषींच्या दिव्य दृष्टीला दिसून आले. असल्या शुक्लवर्णीय ब्रह्म समाजाला त्यांनी ‘ब्रह्म जाणणारे म्हणून ब्राह्मण’ ही संज्ञा दिली. ज्यांचे प्रकाशवलय तांबड्या वर्णाचे असते ते अन्यायाचा प्रतिकार करण्याकरिता भांडणसुद्धा करू शकतील, असे दिसल्याने अशा दिव्य ताम्रपटलाच्या लोकांना ‘क्षत्रिय’ असे म्हटले. काही जण स्वतःचा स्वार्थ पाहून मग इतरांच्याबद्दलही विचार करतात, अशा वृत्तीच्या लोकांचा दिव्य वर्ण पीत दिसून आला म्हणून असल्या वृत्तीच्या लोकांना वैश्य अशी संज्ञा देण्यात आली. जे लोक केवळ स्वार्थीपणे वागतात, अशा लोकांचे वर्णपटल कृष्ण रंगाचे दिसून आले. अशा लोकांना त्यांनी शूद्र अशी संज्ञा दिली. असले वर्ण केवळ दिव्य बुद्धीच्या श्रेष्ठ साधकांनाच दिसतील म्हणून श्रीकृष्णबुद्धी ‘चातुर्वण्यं मया सृष्ट्यं’ म्हणजे ते माझ्याद्वारे रचले गेले, त्यांना मी रचले नाही, ते अगोदरपासूनच समाजात होते, आहेत आणि राहतील, असे व्यास सांगतात. वैदिक ऋषींना ती दिव्य वर्णवलये दिसली. या वर्णप्रकारांना धरून चातुर्वर्ण्याची रचना आहे, जी सनातन व शास्त्रीय आहे.
वृत्तीनुसार वर्ण बदलतो व कर्मानुसारसुद्धा वृत्ती बदलते, म्हणून ऋषींनी त्या-त्या वर्णांना धरून सामाजिक कर्मे वाटून दिली. उच्च वृत्ती ब्राह्मणांना ब्रह्मकर्म, क्षत्रियांना समाज व देशरक्षण, वैश्यांना व्यवसाय, शेती आदी आणि शुद्रांनी दुसर्यांच्या उत्तम कर्माला पाहून, तसेच वागून त्यांची सेवा करावी आणि क्रमागत आपली वृत्ती बदलून आपला वर्णसुद्धा जमल्यास बदलावा, अशी त्या काळी सोय असे. वृत्ती बदलल्यास कोणीही कोणत्याही वर्णांचा बनू शकत असे. शास्त्र सांगते, ‘जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्चते।’ तसे पाहिल्यास जन्मतः प्रत्येकजण शूद्रच आहे, उत्तम कर्माने तो उत्तम वर्णाचा बनू शकतो. परंतु, उन्नत होण्याची ही शक्यता नंतरच्या काळात नाकारली गेली आणि प्रत्येक वर्ण आपापल्या दिलेल्या वर्णाला चिकटून बसला आणि जातीचा अभिनिवेश सुरू झाला. आज आपला वर्ण आपण ‘किरलिअन छायाचित्रणा’तून पाहून शकतो.ज्यांची वृत्ती शुद्ध आहे, असे ब्राह्मणेतर वर्णाचे लोक ब्राह्मण असू शकतात. ते चातुर्वर्णाच्या शास्त्राला धरून ब्राह्मणच आहेत. याउलट आजचे ब्रह्मकर्म करणारे सर्वजण उच्च वृत्तीचे ब्राह्मण असतीलच असे नव्हे. काही स्वभावाने शूद्रदेखील असू शकतात. हे वर्णशास्त्र केवळ भारतातच मध्यकालात उदयाला आले. इतर समाजात त्याचा मागमूससुद्धा नाही. आपल्या ऋषिमुनींना हे ध्यानाद्वारे अवगत होते. याच्या काही साधनासुद्धा आहेत. ध्यानधारणा व रोज सर्वांगासन केल्यास वर्षभरात वर्णवलय पाहण्याची सिद्धी प्राप्त होऊ शकते. साधकांनी प्रयत्न करून पाहावा.
(क्रमशः)
शब्दांकन : राजेश घारपुरे