लखनऊ : योगी सरकारने राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी, तिथे शिकणाऱ्या मुलांना आधुनिक आणि त्यांच्या भविष्यासाठी सुयोग्य असे शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील मदरशांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. पण या त्यांच्या चांगल्या हेतूने केलेल्या कामाने एमआयएमचे अध्यक्ष अससुद्दीन ओवैसी यांच्या पोटात दुखायला लागले. योगी सरकारचा हा नवा डाव असून हे फक्त सर्वेक्षण नसून छोटा एनआरसीच आहे असा कांगावा त्यांनी करायला सुरुवात केली आहे. काहीही करून राज्यातील मुस्लिमांचे भले होऊच द्यायचे नाही आणि योगी सरकारच्या चांगल्या निर्णयांना सातत्याने विरोधच करत राहायचे हाच ओवैसींचा कार्यक्रम असल्याचे ते सातत्याने दाखवून देत आहेत.
ओवैसी हे कुठल्याही प्रश्नावर थेट राज्यघटनेचा हवाला देतात, तसेच याहीवेळी त्यांनी संविधानाच्या कलम ३०चा हवाला दिला आहे. "या कलमांतर्गत आम्हांला विशेष अधिकार मिळाले आहेत. राज्य सरकार सरळ सरळ आमच्या त्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहे, ज्याचा हेतू निव्वळ आणि निव्वळ मुस्लिमांना त्रास देणे हाच आहे" असा आरोप ओवैसींनी केला आहे.
याला सडेतोड उत्तर दिले आहे ते उत्तरप्रदेश सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री दानिश अन्सारी यांनी. ओवैसी हे फक्त स्वतःचीच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजाचीही दिशाभूल करत आहेत. ओवैसींचे आरोप पूर्णपणे खोटे असून राज्य सरकार राज्यातील मदरशांचे आधुनिकीकरण करण्यासाठीच हे सर्व करत आहे. यात अशाही मदरशांचा समावेश आहे ज्यांना अजून सरकारची मान्यता मिळाली नाहीये, पण अशा सर्व मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे, सर्व सोयी -सुविधा मिळवाव्यात यासाठीच राज्य सरकार हे सर्व करत आहे असे प्रत्युत्तर दानिश यांनी दिले आहे.