दिल्लीत सर्वत्र अलर्ट जरी; लष्कर -ए-तय्यबा आणि जैशकडून हल्ल्याची शक्यता
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इंटेलिजन्स ब्युरोकडून सूचना
04-Aug-2022
Total Views | 53
नवी दिल्ली: भारतच्या 'इंटेलिजन्स ब्युरो'ने दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनापूर्वी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि इतर इस्लामवादी गटांद्वारे संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा अलर्ट जारी केला आहे. 'आयबी'च्या दहा पानांच्या अहवालात एलईटी, जेईएम आणि इतर कट्टरपंथी गटांकडून धोका असल्याचे म्हटले आहे. दि. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनापूर्वी लाल किल्ल्यावर प्रवेशाचे कठोर नियम लागू करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
या अहवालात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला आणि उदयपूर आणि अमरावतीमधील घटनांचा उल्लेख आहे. आयबीने दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्ली पोलिसांना १५ ऑगस्ट रोजी कार्यक्रमस्थळी प्रवेशाचे कठोर नियम लागू करण्यास सांगितले आहे.
उदयपूर आणि अमरावतीमधील घटनांचा संदर्भ देत गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना कट्टरपंथी गटांवर आणि गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या कारवायांवरील कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अहवालानुसार, पाक आयएसआय जैश आणि लष्करच्या दहशतवाद्यांना रसद पुरवून दहशतवादी हल्ल्यांना चिथावणी देत आहे. जैश आणि एलईटीला बडे नेते आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
आयबीने आपल्या अहवालात दिल्ली पोलिसांना आणि इतर राज्यांना स्वातंत्र्य दिनापूर्वी कट्टरपंथी गटांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आयएसआयने तयार केलेल्या लष्कर-ए-खालसामध्ये अफगाण सैनिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करू शकते. एलईटी आणि जेईएम या दहशतवादी संघटना हल्ल्यासाठी यूएव्ही (मानवरहित हवाई वाहन) आणि पॅराग्लायडर वापरू शकतात, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे बीएसएफला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच टिफिन बॉम्ब, स्टिकी बॉम्ब आणि व्हीव्हीआयईडीच्या धमकीला तोंड देण्यासाठी आयबीने पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.