संभाजी नगर : संभाजी नगरच्या नामांतराचा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमआयएम पक्षाने औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यास कडाडून विरोध दर्शवलेला आहे. या नामांतराविरोधात संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरून एममायएम आंदोलन करणार आल्याचा इशारा, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.
कोणाच्या वडिलांनी सांगितले म्हणून शहराचे नाव बदलणे चुकिचे आहे, असा टोलाही जलील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. जास्त खासदार, आमदार किंवा नगरसेवक निवडून आले म्हणून शहराचे नामांतर करणे हे चुकीचे असून शहराचे नामांतर करण्यासाठी गुप्त मतदान करण्यात यावे, अशी मागणीही जलील यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबादच्या सभेत वेगळीच भूमिका घेतली होती. ठाकरेंची नामांतराची भूमिका ही केवळ खुर्ची वाचवण्यासाठीचा प्रयत्न आणि इतरांना राजकीय लाभ होऊ नये म्हणून खेळलेली चाल आहे, अशी खोचक टीका जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच खुर्ची जातानाच ठाकरेंना संभाजी महाराजांची आठवण कशी झाली? असा टोमणा मारून जलील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
कॉंग्रेसचे लोक दिसले कि त्यांच्या फोटोवर चपलांची माळ घाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी औरंगाबादमध्ये येऊन दाखवावे, पहा आम्ही त्यांचे कसे स्वागत करतो. नामांतराचा निर्णय घेण्यापूर्वी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी ठाकरेंच्या तोंडावर राजीनामे फेकायला हवे होते, अशी विखारी टीका जालील यांनी ठाकरे सरकार व मित्र पक्षांवर यापूर्वीच केली होती. आता आपण एक सामान्य नागरिक म्हणून मूक मोर्चात सहभागी होणार असल्याचे जलील यांच्या वतीने माध्यमांना सांगण्यात आले आहे.