अंबरनाथ : उल्हास नदीत येणार्या पावसाच्या पाण्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले आहे. नदीवरील पाणी शुद्धीकरण केंद्राच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत असून गाळामुळे नागरिकांना पुरवल्या जाणार्या पाण्याचाही रंग बदलला आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्यातर्फे करण्यात आले आहे.
जून महिना संपत आला तरी ठाणे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत असल्याने उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीसोबतच नदीतील पाणीही गढूळ झाले आहे. बदलापूर शहरात उल्हास नदीवर बॅरेज बंधारा असून तिथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणी शुद्धीकरण केंद्र चालवले जाते. ज्याद्वारे बदलापूर व अंबरनाथ शहराच्या काही भागात पाणी पुरवले जाते.
अंबरनाथमध्ये जीवन प्राधिकरणाच्या पाण्यासोबतच ‘एमआयडीसी’ आणि चिखलोली धरणातूनही पाणीपुरवठा होतो. या बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रातून काही दिवसांपासून बदलापूर, अंबरनाथ शहराला होणारा पाणीपुरवठा गढूळ असल्याचे समोर आले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर प्राधिकरणाने पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.