मुंबई : मुंबई व मुंबईच्या उपनगरात तसेच ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यावर हवामान विभागाने कोकण किनारपट्टीच्या भागात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मान्सून सक्रिय होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकणसह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने याविषयी मुंबई महानगरपालिकेला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंतचा पावसाचा अंदाज दिला आहे.
मागील काही तासांपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर पालघर जिल्ह्यातील काही भागात अजुनही हवा तसा पाऊस झाला नाही. दरम्यात मीरा - भायंदर मध्ये बुधवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. वसई - विरारमध्ये बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. यामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते.