राष्ट्रपतींद्वारे ‘सेवा विवेक’च्या वनवासी भगिनींनी निर्मित बांबू राख्यांचे विमोचन

    01-Jun-2022
Total Views | 61

bambu rakhi
 
 
 
पुणे : पालघर जिल्ह्यातील वनवासी भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मितीसाठी कार्य करणार्‍या ‘सेवा विवेक’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या आकर्षक राख्यांचे विमोचन राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच पुणे येथील राजभवनात करण्यात आले. यावेळी ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष रमेश पतंगे, ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’चे व्यवस्थापक लुकेश बंड, कार्यकर्त्या राजकुमारी गुप्ता तसेच वनवासी भगिनी गौरवी तुंबडा, संजना सांबरे व रिया सांबरे या राष्ट्रपतींसोबत उपस्थित होत्या.
 
 
 
यावेळी राष्ट्रपतींनी बांबू हस्तकलेचे कौशल्य पाहून वनवासी भगिनींचे मोठे कौतुक केले. तसेच त्यांना हस्तकलेमार्फत रोजगार मिळवून दिल्याबद्दल ‘सेवा विवेक’च्या कार्याचेही कौतुक केले. ‘सेवा विवेक’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाकरिता पालघर जिल्ह्यातील वनवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने ‘सेवा विवेक’ या संस्थेने पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.
 
 
 
त्यांच्याकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहुउपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करण्यात येतात. ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनांतून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न व त्यातून ग्रामीण रोजगारनिर्मिती करणार्‍या ‘सेवा विवेक’च्या माध्यमातून वनवासी भगिनींना बांबूपासून निरनिराळ्या आकर्षक व दर्जेदार उत्पादन बनविण्याचे मोफत प्रशिक्षण मागील अनेक वर्षांच्या काळापासून सेंटरच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या प्रशिक्षणानंतर आपलेघरकाम सांभाळून फावल्या वेळात सदर महिला बांबूपासून आकाश कंदील, पेन होल्डर, ट्रे, पेपर वेट, टी-कोस्टर, राख्या इत्यादींसारख्या हस्तकलेच्या २८ प्रकारच्या निरनिराळ्या वस्तू तयार करतात.
 
 
 
या सर्व बांबू हस्तकलेच्या वस्तूंची विक्री संस्थेच्या माध्यमातून केली जाते व त्यातून वनवासी भगिनींना चांगला सन्मानजनक रोजगार प्राप्त होतो आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, या भगिनींनी पुढे येऊ घातलेल्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा धागा म्हणजेच रक्षाबंधन. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या रक्षाबंधनाकरिता वनवासी भगिनींनी स्वदेशी पर्यावरणपूरक, सुंदर, आकर्षक बांबू राख्या तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे, या राख्यांमध्ये वड, पिंपळ, आवळा, बेल, शमी इत्यादींसारख्या देशीवृक्षांचे बीज जोडले आहे. त्यामुळे या राख्यांमुळे पर्यावरणाचा समतोल व संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच या राख्यांना भारतीय नद्यांची नावे देण्यात आली आहेत.
 
 
संस्था करीत असलेल्या ग्रामीण रोजगारनिर्मिती कार्याचे व भगिनींच्या हस्तकलेचे कौतुक करीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संस्थेला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छाही दिल्या. समितीमार्फत बनविलेल्या पर्यावरणपूरक बांबू राख्या या चिनी राख्यांना पर्याय म्हणून बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या प्रकल्पविषयक अधिक माहितीसाठी संपर्क - ७७९८७११३३३
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121