अंबरनाथ : वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली, तर गाडीतील अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमाराला अंबरनाथ लोकनगरी बायपासवर घडली.
लोकनगरी बायपास महामार्गावरून अंबरनाथच्या गोविंदतीर्थ पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २५ मे रोजी बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला वेगाने जाणाऱ्या आर्टिका गाडीमध्ये सहा जण प्रवास करत होते. चालक सागर चांदवानी याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळल्याने उलटली. या अपघातात जखमी झालेल्यांना उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. अंबरनाथ येथील राहणारा अनिल पंजाबी (३७) उपचारादरम्यान मरण पावल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
या अपघातात बंटी नागदेव, दिनक दुसेजा संजू चंदानी, नरेश कासेला तसेच चालक सागर चांदवानी (सर्व राहणार उल्हासनगर) किरकोळ जखमी झाला आहे, तर संजू चंदानी हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्रथोमचार करून मुंबईला हलवण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.