'मराठी शाळा बंद पडल्या तर सर्वात मोठा घात होईल तो खेड्यातील मुलींचा! खेड्यातील मराठी शाळांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे आणि शाळांच्या खाजगीकरणाने तर गोरगरिबांचे शिक्षण बंद करण्याची पुरती सोय केली आहे ' असे प्रतिपादन राजन गवस यांनी आपल्या परिसंवादात केले. मराठी शाळा , मराठी भाषेची जी अवस्था आज आहे त्या बद्दल बोलताना ते म्हणतात, मराठी कधी संपणार नाही परंतु, बी.एड, डी.एड सारख्या अभ्यासक्रमाने शिक्षक नाही,तर कसाईखाने तयार केलेत असे मला वाटते. ' मराठी ' कोणीही शिकवू शकतात हा गैरसमज आज वाढत चालला आहे. आमचे शिक्षक उत्तम होते म्हणून आम्ही ' वाचू ' शकलो पण आज मराठी सारख्या विषयाच्या नोट्स लिहून देतात ह्याहून मोठे दुर्दैव ते काय! असे गवस आपल्या मुलखतीत म्हणतात.
आपल्या साहित्यिक जीवनाबद्दल बोलताना राजन गवस म्हणालेत , माझे बालपण एकीकडे जंगलात गेले, तर दुसरीकडे पुस्तकांच्या सहवासात ते गेले. लेखक जेव्हा लिहू लागतो तेव्हा तो आपले आत्मचरित्रच लिहीत असतो . समाजात घडणाऱ्या घडामोडी त्याला अस्वस्थ करतात आणि त्यातून साहित्य जन्म घेते. याचबरोबर , आपण कवितेपासून दूर जाऊन कथेला जवळ का केले हा प्रश्न केला असता गवस म्हणाले, कविता कधीच दूर गेली नाही. माझी सुरुवातच कवितेने झाली. माझ्या कविता ते कथेचा प्रवास विस्मयकारक आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांनी मला अकाली प्रौढ केले आणि मी कथा लिहू लागलो .'
आपल्या जडणघडणीत आपल्या प्राध्यापकांचा मोठा वाटा आहे असे ते मानतात, त्यांनी सामजिक भान निर्माण केले. त्यांनीच जगण्याचे आयाम दिले. त्या काळात लिहिण्याचे प्रवाह वेगळे होते त्यामुळे कथा, कादंबरी, कविता, सामाजिक कार्यातून व्यक्त होत राहिलो, असे राजन गवस म्हणतात.
मला ' ग्रामीण ' हा शब्द मान्य नाही, मी इतरांच्या भावनांचा आदर करतो परंतु, माझ्या माणसांची हेटाळणी करणारे शब्द मी स्वीकारू शकत नाही. ' समुहभाव ' आणि ' सहानुभव ' हे कृषिजनांच्या मध्यभागी होते त्यामुळे त्यांची मूल्यव्यवस्था, आपुलकी मला भावते. ' देणे ' त्यांची वृत्ती आणि ' दिल्याने वाढते ' हे भाव आणि त्या विरुद्ध असलेली नागरी संस्कृती आहे असे मत राजन गवस यांनी आपल्या संवादात मांडले.
ह्या परिसंवादाचे मुलखतकार होते विनोद शिरसाठ व प्रमोद मनुघाटे. ना. संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत हा परिसंवाद संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडला.