उदगीर : (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी) :
लक्ष्मीबाई टिळक, शांताबाई शेळके यांच्या पासून सिंधूताई सपकाळ तसेच बालकवी यांच्यापासून पु. ल. देशपांडे यांच्या वेशभूषा साकारलेल्या बालकांनी आपापसात साहित्यिक चर्चा केली. निमित्त होते ते ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालमेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याचे!
बालसाहित्यिक आणि लहानग्या प्रेक्षक - श्रोत्यांच्या किलबिलाटात प्रसिद्ध लेखिका ,अनुवादिका वीणा गवाणकर यांच्या अध्यक्षतेत दीपप्रज्वलनाने या बालमेळाव्याचे उद्घाटन नथमलशेठ इन्नाणी सभागृहात झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, उषा तांबे, ज्येष्ठ लेखक दासू वैद्य, साहित्य संमेलनाचे प्रमुख समन्वयक दिनेश सास्तूरकर, रसूल पठाण, प्रभाकर साळेगावकर, बालकुमार मेळाव्याच्या समन्वयिका डॉ. स्मिता लखोटिया, धनंजय गुडसूरकर आदी व्यासपीठावर होते. या मेळाव्याला बालकुमारांची अलोट गर्दी होती. सभागृहाच्या प्रवेशद्वाराशी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा जिवंत देखावा आणि शिक्षणाची बाराखडी दर्शविणारा फलक असे विविध आकर्षणबिंदू या बालमेळ्यात पहायला मिळाले.
याच वेळी 'बालरंग' या साहित्य संमेलनाच्या विशेषांकाचे प्रकाशन कौतिकराव ठाले पाटील, भारत सासणे, उषा तांबे, दासू वैद्य, दिनेश सास्तूरकर, रसूल पठाण, प्रभाकर साळेगावकर, संपादक श्रीनिवास नार्वेकर, पृथ्वीराज तौर, रामप्रसाद लखोटीया आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
बालकवी राजवर्धन पाटील याच्या 'आई राबते घरात, आई राबते रानात, जरी दुःख उरात, तरी आनंदी सुरात' या कवितेने सभागृहातील प्रत्येकाला 'आई'च्या मायेची, छायेची, त्यागाची आठवण करण्यास भाग पाडले. तर ॠतुजा मगरच्या 'वाटण्या आई वडिलांच्या' या कवितेतून आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीवर प्रकाश टाकला गेला. बालकांचं मनोविश्व किती छोट्या छोट्या गोष्टींनी प्रभावित होतं याचे नमुने देणारे अनेक विषय या लहान कवींच्या कवितांतून ध्यानी येते.
बालमेळाव्याच्या उद्घाटनानंतर झालेल्या बालकविंच्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक रसूल पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरूके उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे, शिल्पा बनसोडे यांच्या हस्ते बालकवींना सहभाग प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या संमेलनात सादरीकरणासाठी तब्बल ४०० कवितांची नोंदणी झाली होती. त्यातील ४४ कवितांची निवड तीन परिक्षकांच्या परीक्षणानंतर, मार्गदर्शनानंतर करण्यात आली.