मुंबई,(प्रतिनिधी: “पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण करायची असल्यास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकार्यांचा विशेष ‘टास्क फोर्स’(नालेसफाई) नियुक्त करा, ‘आयएएस’अधिकार्यांना रस्त्यावर उतरून काम करायला लावा, अशा मागण्या भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवार, दि. 13 एप्रिल रोजी मुंबई महापालिका आयुक्त/प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याकडे केली. ‘टास्क फोर्स’च्या मागणीवर प्रशासकांनी सकारात्मक असल्याची माहिती भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपने आयोजिलेल्या सेवा सप्ताहात शेलार यांच्या नेतृत्त्वात मुंबईतील नालेसफाईची पाहणी करण्यात आली. पाहणीवेळी जे भयावह चित्र समोर आले, त्याचा सचित्र अहवाल प्रशासकांना सादर करत भाजपने सविस्तर चर्चाही केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) वेलरासू उपस्थित होते. या शिष्टमंडळात महापालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे, मनपाचे पक्षनेते विनोद मिश्रा, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर, उज्ज्वला मोडक, माजी नगरसेवक महादेव शिवगण यांचा सहभाग होता. पत्रकार परिषदेत या संपूर्ण दौर्याची आणि भेटीची माहिती माध्यमांना दिली.
... तर ‘पूर उपनगर’ होण्याची भीती
“मुंबईची पाहणी केल्यानंतर मुंबई धोक्याच्या वळणावर आहे आणि सत्ताधारी फरार व प्रशासन हाताची घडी घालून बसले आहे. ‘पूर्व उपनगराचे तर पूर उपनगर’ होईल की काय अशी भीती वाटते. भांडुप येथील ‘एपीआय’ नाल्यामध्ये कल्वर्टचे काम अर्धवट झाले. ते पूर्ण झाले नाही, तर रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरेलच, शिवाय भांडुप परिसर जलमय होऊन जाईल. बॉम्बे ऑक्सिजन नाल्यात उभारलेल्या तटरक्षक भिंतीमुळे प्रवाह अडला आहे, असे अजब प्रकार संपूर्ण शहरात पाहायला मिळाले,” असे शेलार यांनी सांगितले.