मुंबई: इन्सानियत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन दत्ताजी मेघे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आर्थिक साक्षरता शिबीर मंगळवार दि. १५ मार्च रोजी वरळीतील जांबोरी मैदान येथीलअंबामाता सभागृहात पार पडले. जनतेमध्ये विशेषतः आजच्या तरुणांमध्ये आर्थिक साक्षरता वाढून त्यांना भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन मिळावे हा या शिबिरामागचा मुख्य हेतू होता.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अर्जुन मेघे यांना त्यांचे दोन सहकारी करण भानू आणि शनय शहा यांची मोलाची साथ लाभली. "आजच्या युवकांनी आर्थिक साक्षरतेचे धडे गिरवून स्वतःच्या मिळकतीचे योग्य नियोजन करावे आणि स्वतःच्या भविष्यासाठी योग्य तरतूद करावी हीच प्रेरणा आजच्या या शिबिरातून युवकांनी घ्यावी" असे अर्जुन मेघे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हटले.
या शिबिरात आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन करण्यासाठी डीएसपी म्युच्युअल फंड्स चे भार्गव मेवावाला आणि न्यू इंडिया को. बँकेच्या प्रीती सिन्हा हे दोघे उपस्थित होते. प्रीती यांनी आर्थिक नियोजनाची सुरुवात ही बनेपासून होते असे सांगून आपल्याला बँकिंग क्षेत्राची सखोल माहिती असणे महत्वाचे आहे असे सांगितले. आपल्या देशातील सर्व प्रमुख बँकांची माहिती, रिझर्व्ह बँक, तसेच व्यापारी बँक आणि सरकारी बँक यांच्यातील व्याजदरांतील फरक, कर्ज घेत असताना कोणती खबरदारी आवश्यक असते या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती दिली. म्युच्युअल फंड्स या नवीन क्षत्राबद्दलची भीती कमी झाली पाहिजे आणि स्वतःच्या भविष्यासाठी थोडीशी जोखीम उचलली तर आपले भविष्य निश्चित सुखकर असू शकते म्हणून आजच्या तरुणांनी या गुंतवणुकीकडे वळले पाहिजे असे डीएसपी म्युच्युअल फंड्सच्या भार्गव मेवावाला यांनी सांगितले. त्यांनी म्युच्युअल फंड्स नेमके असते काय? त्यात गुंतवणूक कशी करावी? एसआयपी म्हणजे काय? म्युच्युअल फंड्स मधील खरेच धोका असतो का? या सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखिका आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ अल्पा शहा यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इन्सानियत असोसिएशनचे प्रवक्ते सागर पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी या क्षेत्रातील अनेक युवक उपस्थित होते.