मुंबई : राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयीन परीक्षांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असतील की ऑफलाईन स्वरूपात याबाबतचा निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. सोमवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील कार्तिक नावाच्या एका अंधविद्यार्थ्याने ऑफलाईन परीक्षेदरम्यान लागणाऱ्या मदतनीसांच्या मागणीसंदर्भात ठाकरे सरकारकडे विनंती केली आहे.
"मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि वर्षा गायकवाड आपणांस विनंती आहे की, आपण जर राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा ऑफलाईन स्वरूपात घेण्याच्या विचारात असाल तर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. अनेक दृष्टीहीन असलेली दिव्यांग मुलं आज माझ्याप्रमाणे शिक्षण घेत आहेत. अशांना लेखी परीक्षेदरम्यान मदतनीस मिळत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आपण मदतनीसांचीसुध्दा व्यवस्था करावी. अन्यथा परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घ्या; जेणेकरून आम्हाला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.", असे कार्तिकचे म्हणणे आहे.