सामान्यपणे शहरात फिरणारा वन्यप्राणी माकड हा बराच चर्चेचा विषय बनतो. यामागचे कारण म्हणजे माकडामुळे होणारे आर्थिक नुकसान. खालील लेखातून या समस्येबद्दल अधिक जाणून घेऊया...
सामान्यपणे जंगलात गेल्यावर पक्षी सोडल्यास स्तनधारी प्राणी फार कमी दिसतात, याचे कारण म्हणजे त्यांचा निशाचर स्वभाव. स्तनधारी प्राण्यांपैकी दिवसा दिसणारे काही प्राणी म्हणजे खारी, चितळ (ठिपकेदार हरण), सांबर, मुंगूस, माकड आणि काळ्या चेहर्याैचे माकड म्हणजेच लंगूर. कोरोनाच्या काळात आपल्याला दिसून आले की, यापैकी प्राणी त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून बाहेर आले होते. कोणाच्या शेतात, वाडीत, तर अगदी शहरांच्या रिकाम्या रस्त्यांवरसुद्धा. जंगली प्राणी हे जंगलापुरतेच मर्यादित असतात, हा गैरसमज आता हळूहळू समाजातून कमी होत चाललाय. सध्या मनुष्यासोबत वास्तव जपणारा एक वन्यजीव म्हणजे माकड.
माकडांचं आपल्या समाजात आणि खास करून हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. त्यांना मारुतीचे रूप समजले जाते आणि म्हणूनच त्याला बरीच लोक पूजतात. नैसर्गिक अधिवासात माकडं ही समूहात राहतात, ज्यामध्ये एक ते दोन प्रौढ नर, अनेक माद्या आणि त्यांची पिल्लं असतात. फळं, काही फुलं, कोवळ्या पानांवर भक्षण करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करतात. असं बघायला गेलं, तर माकडांचे जंगलातले जीवन कठीण आणि आव्हानात्मक असते. अन्न-पाण्याच्या शोधात फिरणे, स्वतःला आणि समूहाला बिबट्यासारख्या मांसभक्षकांपासून सुरक्षित ठेवण्यात आयुष्य जाते. कुठे हवी तशी ’सेफ स्पेस’ मिळत नाही. गेल्या दशकांमध्ये जसजशी शहरे वाढायला लागली, त्याचबरोबर शहरात माकडांचे दिसणेसुद्धा वाढू लागले. याला पूर्णपणे वाढते शहरीकरण किंवा जंगलतोड कारणीभूत ठरत नाही.
वर म्हटल्याप्रमाणे माकडांना शहरात ’सेफ स्पेस’ भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. पूरक अधिवास, शिकार होण्याचा धोका नसणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुष्कळ प्रमाणात असलेले अन्नाचे स्रोत. किंबहुना ‘सुपर मार्केट’मध्ये जशी माणसं फिरतात तशीच काही माकडं शहरात फिरतात. भाजीमंडई, फरसाणची दुकाने आणि छोट्या-मोठ्या ‘फास्टफूड’च्या गाड्यांवर माकडं ’आक्रमण’ करून अन्न पळवून नेताना पाहतो. हे सर्व बघायला खूप मजेदार आणि विनोदी वाटत असले, तरी प्रत्यक्षात ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागात याचे गांभीर्य जास्त दिसते.
भाजी, फळं आणि शेतीवर हमखास ताव मारायला माकडांचे कळप जंगलातून येत असतात. त्यामुळे होणार्या नुकसानीचा हिशोबही ठेवता येत नाही. पर्यायाने शेतकरी हताश होतात. जंगलाबाहेर मुबलक प्रमाणात सुखसोई असल्याकारणाने माकडं आता मानवी वस्तीकडे वळू लागली आहेत. मुंबई, जयपूर, दिल्ली, चंदिगढ अशा शहरांमध्ये माकडांची संख्या खूप प्रमाणात वाढली आहे. मुंबईत माझ्या निरीक्षणात आले आहे की, येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ खास करून माकडं बाहेर फिरतात. त्यांचे अनेक कळप किंवा माकडांच्या टोळ्या ‘अॅगक्टिव्ह’ असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यातील बर्यापच माकडांचा जन्म शहरात झाला असून त्यांनी कधीही त्यांच्या अवघ्या आयुष्यात जंगल बघितले नाही, त्यांना पूर्णपणे ’अर्बन-वाईल्डलाईफ’ म्हटलं, तरी योग्यच ठरेल. लोकांच्या अंगावर धावून जाणं, दात दाखवून घाबरवणं आणि वेळ पडल्यास हल्ला करून, चावून त्यांच्याकडून अन्न पळवून नेणं रोजचे झालंय.
या सर्व त्रासामुळे एक सामान्य नागरिक हताश झालाय. या विरुद्ध असेही आपल्या दृष्टीस पडते की, कुत्र्या-मांजरांना खाऊ घातल्यासारखे बरेच लोक माकडांना हमखास खायला घालतात. ’सेव्ह अॅटनिमल्स’ आणि ’प्राणिसेवे’च्या नावाखाली हे कारभार सुरू असतात. माकडांचा वाढत्या त्रासांमध्ये भर पडणारी ही मंडळी भूतदयेचा मुखवटा लावून गर्वाने फिरतात. यावर तोडगा काय? ‘वन्यजीव संरक्षण कायदा (1972)’च्या ‘शेड्यूल 2’अंतर्गत माकडांना संरक्षण दिले गेले. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांना दिले गेलेले देवाचे स्वरूप, या कारणाने त्यांना मारणे, हुसकावून लावायलासुद्धा लोक भितात. खरेतर आता माकडांच्या त्रासावर तोडगा काढणार्याव धोरणाची गरज आहे.
माकडतापामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर धोरणाने लक्ष केंद्रित केले पाहिजेत. वन्यजीवांचे रक्षण करणे हे सर्वोपरी आहे. परंतु, लोकांचे कल्याणदेखील तेवढेच महत्त्वाचे. माकडाच्या धोक्यामुळे लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होते आणि ग्रामीण भागात त्याचे गांभीर्य मोठ्या प्रमाणात जाणवते. प्रामुख्याने, छोट्या प्रमाणात माकडांना मोठा आवाज करून, चमकदार रंग वापरून आणि दगडफेककरून शहरी भागातून पळवून लावले जाऊ शकतात.
माकडांना एकदा समजले की, त्यांना विशिष्ट ठिकाणी काही फायदा नाही, ते वारंवार तेथे येणे बंद करतात. ग्रामीण भागात विशेषतः जंगलांच्या आसपास, वन्य प्राण्यांना आकर्षित न करणारी पर्यायी पिके लावली जाऊ शकतात. कॅक्टससारख्या जैव-कुंपणाचा वापर, कुंपणामध्ये मिरपूड आणि मिरचीचा वापर माकडे आणि इतर वन्यजीवांना दूर ठेवण्यासाठी दस्तावेजीकरण करण्यात आले आहे. तथापि, या सर्व उपरोल्लेखित उपायांच्या यशाचा दर कमी आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतील, त्यामुळे त्यांना शाश्वत म्हणता येणार नाही.
दीर्घकालीन, निर्बीजीकरण किंवा नसबंदी यांसारख्या उपायांचा विचार केला पाहिजे. माकडे विपुल प्रमाणात प्रजनन करतात आणि खूप लवकर त्यांची संख्या वाढते. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात माकडांचे टोळके मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. माकडांना पकडून, त्यांची नसबंदी करून थोड्या पुनर्वसनानंतर त्यांना सोडणे दीर्घकाळासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण यामुळे त्यांची वाढती लोकसंख्या नियंत्रित होण्यास मदत होईल. त्याहून पुढे पाऊल टाकायचे म्हंटले तर वन्यजीव संरक्षण कायद्यात अमेंडमेंट स्वरूपात माकडांना ’वर्मीन’ घोषित केले जाऊ शकते, त्याद्वारे ते नियंत्रित पद्धतीने मारले जाऊ शकतात. तथापि, ही पद्धत अत्यंत क्लिष्ट आहे. या अमेंडमेंटचा गैरवापर केला जाऊ शकतो ज्यामुळे माकडांची अनियंत्रित हत्या केली जाऊ शकते, आणि त्यावर होणार्याट प्रतिक्रियांचे प्रमाण खूप असेल.
वाढत्या शहरीकरणाचा सध्याचा वेग पाहता, मानव-प्राणी संघर्षाचा प्रश्न आणखी वाढेल, असा अंदाज बांधता येतो. या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करत असताना, असे काही क्षण येथील जेव्हा सरकारचे निर्णय पूर्णपणे प्राणी किंवा मानव यांच्याकडे झुकतील, त्यामुळे समाजात असंतुलन निर्माण होऊ शकते. परंतु, योग्य धोरणांसह, एक समाज म्हणून आपण शाश्वततेकडे लक्ष देऊ शकतो. अशाप्रकारे, मानव आणि वन्यजीव दोघांसाठी अनुकूल वातावरण तयार करता येईल.
ओंकार पाटील