मुंबई : नवीन वर्षात म्हणजेच २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची १८ वर्षे पूर्ण होतील त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमे-अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
१९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत मतदार नोंदणी केली जाणार आहे. कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासबंधी हरकती घेण्याचाही आहे. तसेच, १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, वचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी, तर २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक याच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जातील तसेच तरुण मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत.
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १० नोव्हेंबर रोजी राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभामध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. या मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यानी केले आहे.
मतदान नोंदणीची प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे एखादी निवडणूक जाहीर होताच झाल्यांनतर राज्य निवडणूक आयोगाकडून एका तारखेची निश्चिती केली जाते. त्यानुसार आगामी जाहीर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ३१ मे ही तारीख ठरविण्यात आली आहे, अशी माहितीही श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
सद्यस्थितीत असणारी मतदारसंख्या
१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत एकूण 8 कोटी 96 लाख 41 हजार १९१ मतदारांनी नावनोंदणी केली. तर यात २३ लाख ३४ हजार ९०८ नवीन मतदारांची नवे यात समाविष्ट करण्यात आली. यात ६ लाख ३३ हजार १७१ नावे वगळले गेले. याअंती १७ लाख २ हजार मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. त्यानंतर नव्याने नोंदणीची प्रक्रिया सुरु असल्याने यात १४ लाख ७८ हजार ९३४ नवीन मतदार समाविष्ट झाले आहेत.