वसई : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात तीन बाजूनी समुद्राने वेढलेला भुईकोट किल्ला आहे. आमची वसई तर्फे या किल्ल्यावर दिवाळीच्या पूर्वसंध्येला ७१०० दिवे लावून दीपोत्सव साजरा केला गेला. तसेच आकाशकंदीलही सोडण्यात आले. या दीपोत्सवात वसईकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
चिमाजी आप्पा पेशव्यांनी तब्ब्ल दोन वेळा शर्थीचे प्रयत्न करून हा किल्ला जिंकून घेतला होता. पोर्तुगीजांवर हिंदूंनी मिळवलेल्या विजयाच्या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी आमची वसई तर्फे किल्ल्यातील चिमाजी आप्पा स्मारकावर दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवासाठी पणत्यांचे आयोजन आयोजकांतर्फे करण्यात येते तर वसईतील समस्त जनता या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेते. यावर्षी सुद्धा वसईतील अनेक हिंदू बांधवानी सहकुटुंब येऊन अनेक दिवे स्मारकासमोर लावले.
या वर्षी वसई किल्ल्यातील स्मारकासोबतच किल्ल्यातील मुख्य प्रवेश द्वार, किल्ल्यातील पुरातन नागेश्वर महादेवाच्या मंदिरात, सागरी दरवाज्याजवळ तसेच पूर्व तटबंदीवर कंदील लावून, रांगोळ्या घालून दिव्यांची आरास करण्यात आली होती. वाद्यांच्या गजरांत, घोषणा दुमदुमल्या.
धर्मसभा अध्यक्ष धनंजयशास्त्री वैद्य यांनी मंत्रोच्चारात दिपप्रज्वलन केले व मोहिमेस आशिर्वाद दिला. दिपोत्सवास पालघर जिल्ह्यातील अनेक मान्यवर, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते, लोकसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.