पालघर : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात वनवासी संस्कृतीचा इतिहास ६ बाय ४५ फुटांच्या चित्रातून दिसणार आहे. देशभरातील २५० वनवासी चित्रकारांनी ते साकारले असून पालघर जिल्ह्यातील २० वारली चित्रकारांचाही त्यामध्ये सहभाग आहे. अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमातून जगाच्या कानाकोपऱ्यात वनवासी संस्कृती पोहोचणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनी संचलनात वनवासी संस्कृती दर्शविणाऱ्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे. ६ बाय ४५ फुटांच्या या चित्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या वनवासी संस्कृतीतील घटना आहेत. पाच चित्रांची ही मालिका असून त्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी देशभरात वनवासींवर होणारा छळ, अन्याय आणि त्याविरुद्ध वनवासींनी दिलेला लढा, स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासाठी संघटना तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समूहाने एकत्र राहून शेती व शेतीपूरक व्यवसाय करत असल्याचे चित्रात साकारले आहे. निसर्ग व गावदेवाचे पूजन करून स्वतंत्र भारतात गुण्यागोविंदाने जीवन जगत असल्याचे विविध घटना प्रसंगही आहेत.
‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, न्यू दिल्ली’कडून पंजाब येथील ‘चितकारा युनिव्हर्सिटी’त दि. २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत वर्कशॉप घेण्यात आले. यात देशभरातील २५० चित्रकारांचा सहभाग होता. यामध्ये पालघर जिल्ह्यातील २० कलाकार होते. डहाणूच्या गंजाड गावचे जगप्रसिद्ध वारली चित्रकार ‘पद्मश्री’ जिव्या सोमा म्हसे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या शिष्यांसह इतर सतरा जण या चित्रशैलीत सहभागी असून विक्रमगड तालुक्यातील तीन जणांचा सहभाग आहे.