नवी दिल्ली : अफगानिस्तानमध्ये तालिबानवर संपूर्णपणे ताबा मिळवत अमेरिकन सैन्याला मायदेशी पाठवले. याचदरम्यान तालिबानी राजवट आल्यामुळे जगभरामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदानं तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. याचवेळी त्यांनी शत्रूंच्या ताब्यात असणाऱ्या मुस्लीम बहुल प्रदेश मुक्त करण्याचे आव्हानही केले आहे. याचसोबत त्यांनी काश्मीरचीदेखील आठवण तालिबानला करून दिली आहे. त्यामुळे आता अफगानिस्तानच्या आसपासच्या देशांमध्ये चिंता आणखी वाढली आहे.
अफगाणिस्तानमधील विजयाबद्दल तालिबानला दिलेल्या शुभेच्छा संदेशात अल-कायदाने म्हटलं की, काश्मीर आणि इतर तथाकथित इस्लामिक भूमींना 'इस्लामच्या शत्रूंच्या तावडीतून मुक्त' करणे गरजेचे आहे. यामध्ये अल कायदाने पॅलेस्टाईन, लेवंत, सोमालिया आणि येमेनच्या मुक्तीबद्दलही बोलले आहे. अल कायदाने तालिबानला लिहिलेल्या संदेशात म्हंटले आहे की, "हे अल्लाह, लेवंत, सोमालिया, काश्मीर आणि इतर इस्लामिक भूमी इस्लामच्या शत्रूंच्या तावडीतून मुक्त कर. हे अल्लाह, जगभरातील मुस्लिम कैद्यांना स्वातंत्र्य दे."
यामुळे आता पुन्हा एकदा काश्मीरचा वाद वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानलाही तालिबान आणि अल-कायदाचे बळ मिळणार का? हा मोठा प्रश्न येत्या काळात समोर येईलच. मात्र, काही दिवसांपूर्वी तालिबानचा प्रवक्ता शेर मोहम्मद स्टॅनिकझाई याने सांगितले होते की, "काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत मुद्दा आहे. यामध्ये तालिबानला किंवा अफगाणिस्तानला खेचण्याचा प्रयत्न करू नये. दोन्ही देशांनी आपसात तो प्रश्न मार्गी लावावा. आम्हाला शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध आवश्यक आहेत." त्यामुळे आता अफगाणी तालिबान यावर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.