सातारा : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता दुसरीकडे आता महाराष्ट्रात निपाह विषाणू सापडल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने (एनआयव्ही) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. त्यानंतर शास्त्रज्ञांनी या वटवाघूळांचे नमुने घेत अभ्यास केला होता. त्यातून ही माहिती समोर आली आहे. या संदर्भात त्यांनी एक पत्रक जाहीर केले आहे.
या अभ्यासक्रमाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, यापूर्वी महाराष्ट्रातील वटवाघुळामध्ये अशा प्रकारचे कोणतेही विषाणू आढळले नव्हते. त्यामुळे निपाह विषाणू जर माणसांपर्यंत पोहोचला तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता असते. निपाह विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने रोगांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये ठेवले आहे. एनआयव्हीने नुकतीच त्यांच्या अभ्यासक्रमात आलेली माहिती प्रसिद्ध केली आहे.