अतुल भातखळकर यांची अनोखी योजना
मुंबई : कोरोना सारखी महामारी, निसर्ग, तौक्ते असे दोन चक्रीवादळ, अनेक वेळा अतिवृष्टी होऊन नागरिकांचे हाल होत असताना सुद्धा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे वर्षभर पेक्षा जास्त कालावधीपासून उपनगरात फिरकलेच नाहीत, त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपनगरांत दाखवा व 18-44 वयोगटातील नागरीकांना लसीकरण फुकट मिळवा अशी 'अनोखी' योजनाच मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू करत असल्याची घोषणा मुंबई भाजपा प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकर म्हणाले की,आदित्य ठाकरे यांची मुंबई उपनगराच्या पालकमंत्री नेमणूक होऊन आज दीड वर्षे उलटून गेली. या काळात केवळ एक वेळा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर कोणतीही कार्यवाही पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेली नाही. मागील वर्षी में महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि परवा आलेले तौक्ते चक्रीवादळ यामुळे वर्सोवा, मढ, मार्वे बोरीवली या परिसरातील मच्छीमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले, मालाड मध्ये झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये, इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरगुती साहित्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले, झाडे पडल्यामुळे 48 तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. मी स्वतः व भारतीय जनता पार्टीने वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही.
पुढे भातखळकर म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे लोकांना वाऱ्यावर सोडून, घरात बसून एसीची हवा खाण्यात मग्न आहेत. लपूनछपून ताडोबा पर्यटन करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबईतील नागरिक अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडपडून, होरपळून मृत्युमुखी पडत असताना मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर व रुग्णालयांना भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे, असा खडा सवाल सुद्धा भातखळकर यांनी यावेळी विचारला आहे.