ठाणे : मनसुख हिरन हत्या प्रकरणाचाही तपास 'एनआयए'कडे सोपवा, असे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) दिले आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार 'एनआयए' या प्रकरणाचा तपास करीत असताना 'एटीएस'ने यात हस्तक्षेप न करता आतापर्यंत गोळा केलेले पुरावे व दस्तावेजही 'एनआयए'कडे सुपूर्द करावेत, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी अटकेत असलेले निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरन यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) सचिन वाझे यांचा ताबा हवा होता. गृह मंत्रालयाची सूचना मिळून तीन दिवस उलटूनही महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं तपास हस्तांतरित केला नसल्याची माहिती 'एनआयए'ने न्यायालयाला दिली होती. यानंतर आता ठाणे सत्र न्यायालयाने 'एटीएस'ला महत्त्वाचा आदेश दिला आहे. ५ मार्च या कालावधीत हिरन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आल्यानंतर वाझेला अटक झाली. त्यानंतर विशेष 'एनआयए' न्यायालयाने वाझे यांना २५ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तेव्हा, एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात अर्ज करून मनसुख हत्या प्रकरणही 'एनआयए'कडे वर्ग करण्याची विनंती केली होती. हत्याप्रकरणातील अटकेत असलेला बुकी नरेश गोर व बडतर्फ पोलीस विनायक शिंदे यांचाही ताबा 'एनआयए'ला द्यावा.