आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची गळती : कारणे आणि उपाययोजना

    24-Dec-2021
Total Views | 143

IT_1
 
 
कोरोनाच्या निमित्ताने आपल्या संगणक क्षेत्रापुढे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दुहेरी आव्हान उभे ठाकले. एक म्हणजे, कोरोनाकाळत संगणक सेवा क्षेत्राचा उपयोग अनपेक्षितपणे व दुपटीने वाढला. त्याअनुषंगाने कर्मचाऱ्यांची संख्या अर्थातच तोकडी ठरली. दुसरी बाब म्हणजे, त्याचदरम्यान कोरोना व त्याच्याशी निगडित विविध कारणांनी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याने कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या समस्येत दुहेरी भर पडली.
 
 
नव्या व बदलत्या परिस्थितीत कंपन्या युद्ध पातळीवर काम करुन आपापला व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासोबतच व्यवसायवाढीसाठी भरपूर प्रयत्न करतानाच, या कंपन्यांना आता कर्मचाऱ्यांच्या गळतीच्या नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ठरावीक वा मर्यादित स्वरुपात कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाणे, ही बाब नवी नसली तरी यावेळी उद्योगातील व त्यातही विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मोठी गळती अनेकांसाठी व विविध प्रकारे चिंतनीय ठरली आहे.
 
संपूर्ण संगणक तंत्रज्ञान वा आयटी क्षेत्राचा व्यावसायिक विचार करता, या उद्योगांना उमेदवार -कर्मचाऱ्यांची नेहमीच गरज भासते. कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राजीनामा दिल्याने कर्मचाऱ्यांच्या या संख्येत निश्चितच भर पडते. ‘नॅसकॉम’च्या अभ्यासावर आधारित अंदाजानुसार सद्यस्थितीत आपल्या संगणक उद्योग सेवा क्षेत्राला सुमारे तीन लाख, ५० हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
 
यावर व्यावसायिक उपाय म्हणून आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची निवड, भरती सुरु असते. सध्या तर या प्रयत्नांना विशेष गती देण्यात येत असल्याचे दिसून येते. यातील उल्लेखनीय बाब म्हणून सांगायचे झाल्यास यावर्षी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत ‘टेक महिंद्र’ कंपनीने १५ हजार कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली. कंपनीने गेल्या अनेक वर्षांत एवढ्या मोठ्या संख्येत नव्याने कर्मचारी नेमण्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.
 
एप्रिल ते सप्टेंबर २०२१ दरम्यान ‘कॉग्नीझंट’ कंपनीने १६ हजार कर्मचारी नव्याने नेमले. एकत्रित स्वरुपात सांगायचेच झाल्यास, जुलै-सप्टेंबर या काळात संगणक-तंत्रज्ञान उद्योगातील ‘टीसीएस’, ‘इन्फोसिस’, ‘विप्रो’, ‘एचसीएल’ व ‘टेक महिंद्र’या प्रमुख कंपन्यांमध्ये १ लाख, २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भर पडली. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या नंतरच्या काळात संगणक उद्योगाची नवी व वाढती गरज पूर्ण करण्यासाठी या वाढीव कर्मचाऱ्यांची तेवढीच मोठी भूमिका होती.
 
संगणक सेवा-उद्योग क्षेत्रात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर निवड करणाऱ्या आघाडीच्या सल्लागार कंपन्यांनुसार या क्षेत्राला मार्च २०२१ पर्यंत म्हणजेच पुढील सुमारे तीन महिन्यांमध्ये सुमारे २० हजार नव्या कर्मचाऱ्यांची गरज निश्चितपणे भासणार आहे. अधिक तपशिलासह सांगायचे म्हणजे, प्रमुख व्यवस्थापन सल्लागार कंपनी ‘अर्न्स्ट अ‍ॅण्ड यंग’ नुसार त्यांची कंपनी संगणक इंजिनिअर स्तरावर सहा हजार उमेदवारांची तर अन्य प्रमुख व्यवस्थापन सल्लागार कंपनी ‘प्राईस वॉटर कूपर’ कंपनीतर्फे तीन हजार इंजिनिअर्सची नव्याने भरती करणार आहे. आयटी क्षेत्रात नव्याने दाखल होणारे हे इंजिनिअर्स संगणकशास्त्र व तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित व अद्ययावत माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे उद्योग-व्यवसाय विषयक माहिती व तपशिलाचे संकलन, विश्लेषण संगणकीय सुरक्षा, आर्थिक व्यवहार व त्यासंदर्भात सल्ला मार्गदर्शन देण्याचे काम करणार आहेत.
 
बंगळुरु येथील मार्केटिंग सल्लागार कंपनी ‘अनअर्थ इनसाईट्स’ नुसार आगामी वर्षी म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात संगणकशास्त्र व सेवाक्षेत्रात सुमारे ४ लाख ५० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. यामध्ये व्यवस्थापक, इंजिनिअर्स, तंत्रज्ञांनापून सेवाविषयक काम करणाऱ्या विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश अपेक्षित आहे. उद्योग-व्यवसायाची वाढ होत असतानाच संगणक तंत्रज्ञान उद्योगाला कर्मचाऱ्यांच्या गळतीनेनव्याने घेरल्याचे दिसून येते. यासंदर्भात पडताळ्यासह अभ्यास केल्यास लक्षात येते की, व्यवसायात मंदी-प्रगती या दोन्ही वेळा संगणक उद्योग क्षेत्रात कर्मचाऱ्यांची गळती ही होतेच. यातच भर पडते ती या क्षेत्रात होणारे तंत्रज्ञानविषयक बदल आणि व्यवसायवाढ. मात्र, या साऱ्यांचा परिणाम व परिणती होते ती कर्मचाऱ्यांच्या गळतीमध्ये!
 
‘टीसीएस’ कंपनीच्या पूर्व-परंपरेनुसार कंपनीने पूर्वकाळात कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाणे प्रसंगी मोठ्या प्रमाणात बघितले आहे. यातून काही प्रश्न उभे ठाकले तसेच समस्यांनाही सामोरे जावे लागले. काही प्रमाणात व्यवसायावर परिणाम झाला. या साऱ्या प्रश्न आणि समस्यांवर ‘टीसीएस’ कंपनीचे व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांनी यशस्वीपणे मात केली. कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न आणि मुद्द्यांसह त्यांच्या समस्या व आशा-अपेक्षांचा अभ्यास केला. त्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी केली व त्यातून ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण कमी कसे होईल,यासाठी सातत्याने व विविध प्रकारे प्रयत्न केले. परिणामी, ‘टीसीएस’मधील कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण नियंत्रितच नव्हे, तर सर्वात कमी राहिले. आजही ही परंपरा कायम ठेवत सध्याच्या अस्थिर व आव्हानपर स्थितीतही ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांची गळती संगणक उद्योग क्षेत्रातील इतर व तुलनात्मक कंपन्यांच्या तुलनेत सर्वात कमी राहिले आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय आहे.
 
गेल्या काही वर्षांतील व्यावसायिक स्थिती व विशेषतः कोरोनानंतरची उद्योगांमध्ये झालेली मोठी उलथापालथ यामुळे विविध आयटी कंपन्यांनी आपल्या व्यावसायिक धोरणांमध्ये मोठे आणि मूलभूत बदल केल्याचे दिसून येते. ‘टेक महिंद्रा’ कंपनीने यासंदर्भात दोन प्रकारे काम केले आहे. एकीकडे या आणि अशा आव्हानपर व अस्थिर व्यावसायिक परिस्थितीतसुद्धा ‘टेक महिंद्रा’ कंपनीने अमेरिकेतील दोन प्रमुख संगणक कंपन्यांचे अधिग्रहण करुन मोठे धाडसाचे काम केले. याशिवाय कोरोनानंतरच्या नव्या स्थितीवर अधिक परिणामकारक व प्रभावी उपाययोजना म्हणून पूर्वापार स्वरूपात मोठ्या व महानगरांमधील कार्यालयांमधूनच काम करण्याऐवजी विविध राज्यातील छोट्या शहरांमधून काम करण्यास प्राधान्य दिले. याच्याच जोडीला ‘टेक महिंद्रा’ कंपनीने मध्यम स्वरूपातील शहरांमधून उमेदवार निवडण्यावर जोर दिला. यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडून जाण्याच्या प्रमाणात काही प्रमाणात घट नोंदवण्यात आली.
 
तसे पाहता, संगणक उद्योग क्षेत्रात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावरील गळती यापूर्वीही दिसून आली. यामध्ये प्रामुख्याने व्हाय-टू-के, डॉटकॉम नंतरची स्थिती, लेहमन ब्रदर्सच्या निमित्ताने निर्माण झालेले संकट या साऱ्या प्रसंगी संगणक क्षेत्रातून फार मोठ्या संख्येत व प्रमाणात कर्मचाऱ्यांची गळती झाली होती. कोरोनाच्या निमित्ताने आपल्या संगणक क्षेत्रापुढे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दुहेरी आव्हान उभे ठाकले. एक म्हणजे, कोरोनाकाळत संगणक सेवा क्षेत्राचा उपयोग अनपेक्षितपणे व दुपटीने वाढला. त्याअनुषंगाने कर्मचाऱ्यांची संख्या अर्थातच तोकडी ठरली. दुसरी बाब म्हणजे, त्याचदरम्यान कोरोना व त्याच्याशी निगडित विविध कारणांनी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याने कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या समस्येत दुहेरी भर पडली.
 
 
तसे पाहता, व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण सर्वच उद्योग क्षेत्राला लागू असते. हीच बाब संगणक उद्योगाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास या क्षेत्रात कर्मचाऱ्यांचे सोडून जाण्याचे प्रमाण नेहमीच इतर क्षेत्रांपेक्षा अधिक राहिले आहे व ही एक सहज प्रक्रिया आहे. जाणकारांच्या मते, संगणक क्षेत्रातील कर्मचारी गळतीचे वाढते प्रमाण या उद्योगाच्या ठोस प्रगतीचे प्रतीक सिद्ध झाले असून, कोरोनानंतरच्या प्रगतीचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणूनच या प्रकाराकडे आशादायी स्वरूपात पाहायला हवे.
 
 
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन व सल्लागार आहेत.)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121