
पंढरपुरात आंदोलन करण्याचा दिला इशारा!
मुंबई : कोरोनामुळे जवळपास चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेले मंदिरे उघडे करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी सरकारकडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे सरकारने दखल न घेतल्याने आता प्रकाश आंबेडकर अधिकच आक्रमक झाले आहे. राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
आंबेडकरांचे हे पाऊल अतिशय योग्य असल्याचा निर्वाळा वारकरी संप्रदायातून येत असून मंदिरे उघडल्यावर देव दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि याचा उपयोग कोरोनासाठी लढाण्याला होईल, असा विश्वास वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ नेते माधवमहाराज शिवनीकर यांना आहे. मंदिरे उघडणे ही काळाची गरज असल्याचे ते सांगतात.
राज्यातील दारू दुकाने सुरु झाली, सर्व व्यवहार सुरु झाले, लग्न कार्ये होऊ लागली, मग भजन कीर्तन करणे आणि मंदिरात जाऊन प्रार्थना करणे का सुरु होत नाही, असा सवाल विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे यांनी केला आहे. याचसाठी आम्ही हे आंदोलन सुरु केले असून जेव्हा सरकार आणि शास्त्रज्ञांना अजून लस शोधण्यात यश येत नाही तेव्हा किमान मंदिरामध्ये जाऊन सकारात्मक ऊर्जा तरी आम्हाला मिळवता यावी अशी भूमिका मांडतात. यासाठी वारंवार सरकारला मागणी करूनही सरकार विचार करत नसल्याने बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी, बस सेवा चालू करण्यात आली. शासनाने पानटपऱ्या, केस कर्तनालाय यांची दुकाने व इतर व्यवसाय सुरू झाले. मात्र मंदिर अद्यापही बंद आहेत. दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला आहे. येत्या ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले झाले नाही तर लाखो वारकरी ३१ ऑगस्ट रोजी मंदिरात प्रवेश करतील. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.