राजस्थानच्या सत्तासंघर्षानंतर अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया!
जयपूर : मागच्या दीड वर्षांपासून सचिन पायलट आणि माझ्यात संवाद नाही. राजस्थानात आमचे सरकार स्थापन झाल्यापासूनच सचिन पायलट ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. तसेच, सरकारस्थापनेनंतर ते मुख्यमंत्र्यांचा कोणताही सल्ला घेत नव्हते. आमच्यात कुठलाही संवाद नव्हता. लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धीही परस्परांशी बोलतात. लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा आहे, असे अशोक गेहलोत म्हणालेत. मात्र, आता जर पायलट परत आलेत तर त्यांना मिठी मारेन असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले आहेत.
राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने राजकीय संकट उभे राहिले आहे. पक्षाविरोधात बंडखोरी केल्याने काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केले. तर दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षांना सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला पायलट समर्थक आमदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.