मुंबई : जेव्हा एखाद्या मंत्र्यांचेच सुरक्षा रक्षक माणसांना घरातून उचलायला सांगतात, तिथे पोलीस दलाला आणखी संदेश मिळणार असे म्हणत भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी पालघर साधू हत्या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !,असे म्हणत त्यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार, अतुल भातखळकर व पराग अळवणी यांनी पालघर येथे घडलेल्या साधू हत्येच्या तपासाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर येथे निवेदन दिले. तसेच या घटनेचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी होत आहे. १६ एप्रिल रोजी पालघरमधील गडचिंचले यागावात जमावाने २ साधू त्यांच्या ड्रॉयव्हरची हत्या केली. याचा व्हिडीओ दोन दिवसांनी व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील या घटनेचा योग्य तपास व्हावा अशी मागणी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ते म्हणतात, ‘राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मुंबईत बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला. आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनांबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून वरील घटनांची निःपक्ष चौकशी करावी’, अशी आमची मागणी आहे.