हल्ल्यात सामील १०१ जणांना अटक
पालघर : पालघरमध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यात सहभागी झालेल्या आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. चोर समजून मारहाण करण्यात आलेल्या तीन प्रवाशांच्या मारहाणीचा व्हीडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक ड्रायव्हर आणि दोन साधूंना शंभर एक लोकांनी जीवे मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये घडली होती.
गुरुवारी रात्री गडचिंचले येथे चोर आल्याची अफवा पसरली होती. या अफवेनंतर ग्रामस्थांनी दाभाली-खानवेल मार्गावरुन जाणाऱ्या गाडीला अडवले. या कारमध्ये बसलेल्या तिघांची त्यांनी विचारपूस केली. त्यांनी काही सांगायच्या आत ग्रामस्थांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तर इतर ग्रामस्थांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती कळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जमावाने पोलिसांनाही दाद दिली नाही.
साधूंची निघृण हत्या करण्यात आली, या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. त्यानंतर या तीन जणांवर आणि कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली आहे.
हल्ल्यात सामील असलेल्या १०१ जणांना अटक केले असून त्यांच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचे विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे, असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.