पुन्हा एकदा भास्कर जाधवांची नाराजी उघड...
रत्नागिरी : कोकण दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गणपतीपुळे विकास आराखड्याचे भूमिपूजन पार पडले. परंतु, यावेळी व्यासपीठावर भास्कर जाधव, विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावेळी विनायक राऊत यांनी भास्कर जाधवांचा हात पकडून जवळ करण्याचा प्रयत्न केला असता भास्कर जाधवांनी त्यांचा हात झटकला. व्यासपिठावर घडलेल्या या घटनेने भास्कर जाधवांची नाराजी जगजाहीर झाली आहे. हा सगळा प्रसंग प्रसार माध्यमांच्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गणपतीपुळे येथे भूमी पूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर भास्कर जाधव हे मागच्या रांगेमध्ये बसले होते. उदय सामनात यांनी त्यांना विनंती केल्यानंतर जाधव पहिल्या रांगेत पण शेवटच्या खुर्चीवर बसले. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला वेळेस जे घडले ते सर्वांनी पहिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आग्रहानंतरही भास्कर जाधव मागेच राहिलेले दिसले. भास्कर जाधव यांना मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज असल्याच्या अनेक बातम्या याआधीही समोर आल्या. मात्र, या प्रकारामुळे आता त्यांची नाराजी जगजाहीर झाले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाऊन महा विकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र, मंत्रीमंडळामध्ये भास्कर जाधव यांना डावलले होते. याबद्दल भास्कर जाधवांनी नाराज असल्याचे बोलून दाखवले होते. भर सभेमध्ये झालेल्या या सर्व प्रकारानंतर त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याचेच चित्र दिसून येत आहे.