देशविरोधी वक्तव्ये करणाऱ्या शरजील इमामला अटक
28-Jan-2020
Total Views |

पटना : भारतापासून आसाम स्वतंत्र करा असे म्हणत देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या शरजील इमामला अखेर अटक करण्यात आली आहे. बिहारमधील जहानाबाद या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी जहानाबाद या ठिकाणी शरजीलच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला गजाआड केले. दिल्ली येथील जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा तो माजी विद्यार्थी होता. त्याने चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच देशद्रोहाचा आरोपही त्याच्यावर आहे. दरम्यान, पोलिसांनी शरजीलला अटक करण्यासाठी सोमवारी रात्री बिहारमधील त्याच्या वडिलोपार्जित निवासस्थानावरही छापा टाकला. छाप्यादरम्यान शरजील सापडला नाही तर पोलिसांनी त्याचा भाऊ मुझम्मिल आणि त्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांकडून चौकशी केली जात आहे.
शरजील इमामच्या शोधात सहा राज्यांचे पोलीस
शरजील इमामच्या शोधात सहा राज्यांच्या गुन्हे शाखा कार्यरत आहेत. त्याच्याविरूद्ध सहा राज्यात देशद्रोहाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांनी त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केले आहेत. शरजीलच्या अटकेसाठी पोलिस बिहारसह मुंबई आणि दिल्ली येथेही छापे टाकत आहेत. त्याचे नेपाळमध्ये पलायन होण्याच्या धर्तीवर बिहार-नेपाळ सीमेवरही अलर्ट जारी करण्यात आला होता
जेएनयू प्रशासनाने मागितले स्पष्टीकरण
दरम्यान, शरजीलच्या बाबतीत जेएनयू प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जेएनयू प्रॉक्टरने शरजीला समन्स बजावून देशद्रोहाच्या आरोपावरून ३ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे.
देशद्रोहासह अनेक गंभीर आरोपांनी घेरलेल्या शरजील इमामचा मोठा राजकीय संबंध उघड झाला आहे. तो जेडीयू नेते अकबर इमाम यांचा मुलगा आहे. अकबर इमाम यांनी जेडीएच्या तिकिटावर जहानाबाद येथून विधानसभा निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत ते राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) सच्चिदानंद यादव यांच्याकडून पराभूत झाले. शरजीलचा एक छोटा भाऊ असून जहानाबादचे माजी खासदार अरुण कुमार यांच्याशी त्याचे निकटचे संबंध आहेत.