काल रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची एनडीआरएफकडून सुटका करण्यात आली. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने रात्रीपासून मदतकार्य सुरु केले आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. रेल्वेमध्ये जे प्रवासी अडकून पडले होते त्यांना सोडवण्यात आले असून त्यांना जवळच्या प्लॅटफॉर्मवर आणले गेले. एनडीआरएफ आणि नौदलाच्या मदतीने अडकलेल्या सुमारे अकराशे प्रवाश्यांची सुटका केली. मुसळधार पावसाने मदत कार्यात वारंवार अडथळे येत होते , त्याची तमा न बाळगता जवानांप्रमाणेच पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी देखील चोख कामगिरी बजावली.
नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी एनडीआरएफच्या मदतीला नौदलाची एक टीमही घटनास्थळी उपस्थित झाली आहे. सोबतच नौदलाचे एक हेलिकॉप्टरही तैनात आहे. सुरुवातीला महिला आणि लहान मुलांना बोटीच्या सहाय्याने रेल्वेतून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात येते आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि पुरुषांनाही हलवण्यात येईल. रेल्वेतून जवानांनी बोटीतून प्रवाश्यांना सुखरूप उतरवले यात काही वृद्ध , आजारी पुरुष महिला प्रवासी देखील होते , एनडीएफ आणि ग्रामस्थांमुळे आम्ही सुखरूप आहोत, कल्याण सोडल्यानंतर अंबरनाथला गाडी यायला किमान तीन तासाचा कालावधी लागला.
24 तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा
मुंबई विभागात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे २४ तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतून उड्डाण घेणाऱ्या ७ फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर ८ फ्लाईट्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शाळांच्या सुट्टीचा निर्णय हा त्या विभागातील मुख्याध्यापकांनी घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat