कोमसापतर्फे वाङमय पुरस्कारांसाठी आवाहन

    24-Jul-2019
Total Views | 49



रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर २०१९मध्ये घोषित होणार्‍या वाङमय पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार कोसमापचे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.

 

प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहेत. कादंबरी, कथा, कविता, समिक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांकरिता पुरस्कार दिले जातील. र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय किर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

 

सौ. लक्ष्मीबाई व न्यायमुर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल. विशेष पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे सात पुरस्कार असून त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङमय, संकिर्ण गद्य, नाटक एकांकिका, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेटये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरूरकर बालवाङमय पुरस्कार, वि. कृ. नेरूरकर संकिर्ण वाङमय पुरस्कार, अरूण आठल्ये संकिर्ण वाङमय पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकीका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुर्वाता वसई पुरस्कार आहेत.

 

पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१९ पूर्वी पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक रा. ठाकूर द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, ता. जि. पालघर, ४०१४३०४ यांच्याकडे पाठवाव्यात. लेखक/कवी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यातील) असावा तसेच तो कोकण मराठी साहित्य परिषदेचा आजीव सभासद असणे आवश्यक आहे तशा प्रकारचे कोमसाप जिल्हा अध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

पुस्तकाचा वाड्मय प्रकाराचा स्पष्ट उल्लेख (कथा, कादंबरी, कविता, ललित वाङमय इत्यादी) लेखकाने पुस्तकांसोबत करावयाचा आहे. पुस्तके एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या एका वर्षात प्रकाशित झालेली असावीत. एखाद्या लेखकाच्या / कविच्या एका वाड्मय प्रकाराच्या पुस्तकाचा पुरस्कारासाठी फक्त दोन वेळाच विचार केला जाईल, असे प्रा. अशोक रा. ठाकूर निमंत्रक, पुरस्कार समिती कोकण मराठी साहित्य परिषद यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121