शांततेसाठी नाही तर; 'या' मूळे झाली अभिनंदन यांची सुटका!

    01-Mar-2019
Total Views | 610


 

 

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची आज सुटका होणार आहे. पाकिस्तानचा हवाई हल्ला परतावून लावताना ते दुर्दैवाने पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दोन्ही देशात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात सुपूर्द करण्यात येत असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. मात्र, अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तान तयार होण्यामागे मोदी सरकारच्या कूटनीतिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.. अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यापासून दोन दिवसात पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या? मोदी सरकारचे पाकिस्तानची कोंडी कशी केली पाहूया.

 

१) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्या अँबेसिडरशी चर्चा केली. यात भारत दहशतवादाविरोधात लढत आहे पाकिस्तानशी नाही हे समजावून सांगितले. यानंतर पाकिस्तानच्या या दोन मित्र पक्षांचा अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढला.

 

२) भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनमध्ये झालेल्या बैठकीत भारत दहशतवादाविरोधात लढत आहे पाकिस्तानशी नाही आणि भारताने केलेली कारवाई ही लष्करी कारवाई नसून दहशतवादाविरोधातच कारवाई केली होती असे चीनला समजावून सांगितले. यानंतर चीनने पाकिस्तानला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता.

 

३) आर्थिकदृष्ट्या खिळखिळ्या झालेल्या पाकिस्तानच्या अमेरिका, चीन आणि सौदी अरेबिया या तीन मुख्य मित्र देशांनी पाकड्यांची साथ दिली नाही. या देशांच्या मदतीवरच पाकिस्तान चालतो. यामुळे सहाजिकच पाकिस्तानवर दबाव वाढत गेल्याने त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही.

 

४) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ब्रिटनच्या सुरक्षा सल्लागारांशी फोनवरून चर्चा केली. यात त्यांनी भारताची भूमिका समजावून सांगितली. यासोबतच भारताने महत्वाच्या देशांना आपली भूमिका समजावून सांगितली. यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव वाढला.

 

५) अभिनंदनला सोडण्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा करार, चर्चा किंवा सौदेबाजी केली जाणार नसल्याचेही भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगत अभिनंदनला जिनेव्हा करारानुसार सोडण्याची मागणी केली. यासोबतच अभिनंदनला काही नुकसान पोहोचवले किंवा त्याला सोडले नाही तर त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील असा सज्जड दमही भारतने पाकिस्तानला भरला.

 

६) पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय लढाऊ विमान पाडल्याचे आणि दोन वैमानिक पकडल्याचा दावा केला. पण तो चुकीचा होता. या दाव्यांचा परिणाम पाकिस्तानच्या विश्वसनीयतेवर झाला.

 

७) मसूद अजहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउंसिलमध्ये अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी प्रस्ताव मांडला.

 

यामुळे चोहीबाजूने मोदी सरकारने पाकड्यांच्या नाड्या दाबल्याने भारतासमोर घुडगे टेकवण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणूनच इमरान खान हे जरी अभिनंदन यांना शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने सांगत सुटत असले तरी यामागे मोदी सरकारच्या कूटनीतिक राजकारणाचा मोठा दबाव होता, हे सांगायला कोण्या विशेषतज्ज्ञाची गरज नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121