मुंबई : मुंबई शहराला स्वच्छ आणि दुर्घटना मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. तब्बल दहा हजार पाचशे कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण मुंबई शहरावर लक्ष ठेवले जाणार आहे. मुंबईत सध्या मुंबई पोलिसांकडून ५००० कॅमेऱ्यांद्वारे मुंबईवर लक्ष ठेवले जाते. परंतु हि यंत्रणा अपुरी पडत असल्याने आता नवीन ५५०० कॅमेरे मुंबई शहरात बसविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्भया फंडातून ५ हजार तर मुंबई महापालिकेच्या खर्चातून ५०० कॅमेरे बसविण्यात येतील.
मुंबई पोलिसांकडून बसविण्यात आलेले कॅमेरे गुन्हेगार आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरात येतात त्याचा मुंबई महापालिकेला सहसा उपयोग होत नाही. त्यामुळेच आता इस्त्राईलच्या धर्तीवर 'अनॅलिटीक्स टूल्स'च्या साहाय्याने आधुनिक तंत्रज्ञान असणारे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता कुठेही कचरा टाकणे, रस्त्यावर डेब्रीजचा डम्पर रिकामा करणे, नाल्यात कचरा टाकणे यांसारख्या गोष्टी करणाऱ्यावर महापालिकेची बारकाईने नजर राहणार आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा, आणि कुठेही कचरा टाकत असाल तर तुमच्यावर मुंबई महापालिकेची कडक कारवाई होऊ शकते. या आधुनिक अनालिटिक्स टूल्सद्वारे आग लागणे, इमारत पडणे अशा आपत्कालीन स्थितीत घटनांचे नोटिफिकेशन तात्काळ महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागास प्राप्त होईल जेणेकरून ते कक्ष संबंधित यंत्रणाना याबाबत माहिती कळवेल. मुंबईच्या आपत्कालीन विभागाने काही ठिकाणे निवडली आहेत ज्याठिकाणी वारंवार रस्त्यावर कचरा टाकला जातो, डेब्रीज रिकामे केले जातात, तसेच पावसाळ्यात लवकर पाणी साठणाऱ्या ठिकाणांचा हि यात समावेश आहे.