नवी दिल्ली : भारताच्या उत्तरपूर्व भागातील राज्य असलेले सिक्कीम हे जगातील पहिले 'ऑरगॅनिक स्टेट' ठरले आहे. यासाठी सिक्कीमला संयुक्त राष्ट्र संघाकडून 'फ्यूचर पॉलिसी अवार्ड' देण्यात आला आहे. सिक्कीम राज्यात १०० टक्के शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते. तसेच राज्यात रासायनिक खतांचा व पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणल्यामुळे तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यामुळे हा पुरस्कार दिला गेला असल्याचे 'इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रीकल्चर मुव्हमेंट्स'ने म्हटले आहे.
विविध देशांमधून ५१ राज्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता. यासर्वांवर मात करत सिक्कीम जगातील 'ऑरगॅनिक स्टेट' ठरले आहे. या पुरस्काराला 'बेस्ट पॉलिसीचा ऑस्कर' असे देखील म्हटले जाते. २०१६ साली सिक्कीमने रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणली होती. सिक्कीम सरकारने राबवलेल्या या धोरणामुळे ६६ हजार शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारले. तर २०१४ ते २०१७ या काळात राज्यातील पर्यटनाचा आकडा ५० टक्क्यांनी वाढला असल्याचे 'आयफओएएम'ने म्हटले आहे.
रोम येथे १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांनी हा पुरस्कार सिक्कीमच्या नागरिकांचा असल्याचे म्हटले. दरम्यान, २०१६ साली सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/