सरडा आणि ड्रॅगन

    08-Jul-2017   
Total Views |


 

गेल्या महिन्याभरात भारत-चीन सीमेवर सिक्कीमच्या भागात बर्‍याच हाणामार्‍या सुरू झालेल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांना खास आमंत्रण देऊन अमेरिकेला बोलावले आणि शिखर बोलणी करण्याचा प्रस्ताव मांडला; तेव्हापासून चीनला अकस्मात पोटदुखीचा विकार जडलेला आहे. त्यानंतरच या गडबडी सुरू झालेल्या आहेत. त्यात सीमेवरील भारतीय सेनेचे खंदक उखडून टाकणे व भारतीय सैनिकांशी झोंबाझोंबी करणे; असे अनेक प्रकार चालू आहेत. केवळ सीमेवरच हा प्रकार रंगलेला आहे, असेही मानायचे कारण नाही. राजनैतिक व मुत्सद्देगिरीच्या प्रांगणातही चीनने कुरबुरी सुरू केल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब चीनच्या सरकारी इंग्रजी मुखपत्रामधील चर्चेत पडलेले असते. ‘ग्लोबल टाइम्स’ नामक या वर्तमानपत्रात आज-काल मोठ्या प्रमाणात भारताला इशारे देण्याचे कामचालू झालेले आहे. चीनच्या एका प्रवक्त्याने अलीकडेच भारताला १९६२ सालच्या लज्जास्पद पराभवाची आठवण करून दिलेली आहे. तो इतिहास भारताने कधी नाकारलेला नाही आणि त्यातून बाहेर पडण्याची पराकोटी केलेली आहे. त्यानंतरच भारताने पाकिस्तानशी दोन युद्धे जिंकलेली आहेत आणि त्यापैकी एका युद्धात पाकिस्तानचे तुकडे पाडून आशियाचा राजकीय भूगोलही बदलला आहे. पण चीन मात्र अजून १९६२ सालाच्या इतिहासातून बाहेर पडायला राजी दिसत नाही; किंबहुना आपण अलीकडल्या कालखंडात कमालीचा बदलून गेलेला देश आहोत आणि धमक्या देण्याइतकी आपली कुवत राहिलेली नाही, याचेही भान चिनी मुत्सद्दी विसरून गेलेले असावेत. भारताला १९६२च्या पराभवाची आठवण करून देणार्‍यांना इवल्या व्हिएतनामदेशाकडून आपल्या महान लालसेनेला माघार कशाला घ्यावी लागली, त्याचे स्मरण उरलेले नाही काय? असते तर त्यांनी भारताला १९६२ची आठवण करून देण्याचा आगाऊपणा केला नसता.

मागल्या तीन-चार दशकांत आपल्या प्रचंड लोकसंख्येचा कच्चा माल म्हणून वापर करताना चीनने प्रगत पाश्चात्त्य देश व अन्य ठिकाणच्या कंपन्यांना मायदेशी आणून स्वस्तातली मजुरी उपलब्ध करून दिली. त्यासाठी सरकारच मजूर कंत्राटदार होऊन गेले आणि स्वस्तातल्या मजुरीलाही काही हिस्सा बळकावून, त्याने भांडवल उभारले आहे. ते जगभर गुंतविण्यातून जे काही आर्थिक औद्योगिक साम्राज्य उभे केले, त्यालाच आजचे चिनी राज्यकर्ते महाशक्ती मानत असावेत. पण वस्तुस्थिती तितकीशी खरी नाही. चीनचा विकास बहुतांश प्रमाणात पूर्वेच्या बाजूला केंद्रित झालेला आहे आणि पश्चिमभागामध्ये आजही जुनेच दारिद्य्र व गरिबी नांदते आहे. त्या गरिबीची मुस्कटदाबी चालू असल्याने असंतोषाचा ज्वालामुखी दबलेला आहे. संधी मिळाल्यास तो उफाळून येऊ शकतो. अधिक जागतिक महत्त्वाकांक्षा बाळगताना चीनने जगभर केलेली गुंतवणूक तशी लाभदायक मानता येणार नाही. तत्कालीन लाभ बघूनच अशी गुंतवणूक झालेली आहे. प्रामुख्याने शेजारी पाकिस्तानात केलेली मोठी गुंतवणूक एकूणच जिहादी संकटाने व्यापलेली आहे. अशा स्थितीत भारताला युद्धाच्या धमक्या देण्याच्या परिस्थितीत चीन नाही. कारण तो आता पूर्वीसारखा नुसता कोट्यवधी लोकसंख्येचा देश नसून व्यापक उद्योगक्षेत्र पसरलेला देश आहे. त्याला आपल्या उद्योगांना युद्धाच्या खाईत लोटण्याची हिंमत सहजासहजी होऊ शकत नाही. म्हणूनच नुसत्या पोकळ धमक्या देणे किंवा हुलकावण्या देणे ही वेगळी गोष्ट आहे आणि १९६२च्या युद्धाचे स्मरण करून देणे, नुसत्याच वल्गना आहेत. तितक्या शक्तीनिशी युद्धात उतरण्याची सवयही आता चिनी लालसेनेला राहिलेली नाही. दिखावू समारंभात पाय आपटून संचलन करण्याने कोणी युद्धसज्ज सेना होत नाही. त्यापेक्षा कमी साधनातही भारतीय सेना अधिक सज्ज आहे. कारण आपण मागली दोन दशके जिहादला तोंड देत आहोत.

मागल्या सात दशकात चीनने किती युद्धे केली आणि किती विजय साजरे केले? त्याची इतिहासात कुठे नोंद नाही. दुसर्‍या महायुद्धानंतर जगातले अनेक देश स्वतंत्र झाले आणि अनेक देशांत कम्युनिस्ट क्रांतीही झाली. त्यातलाच एक देश चीन आहे. आरंभी माओच्या नेतृत्वाखाली जी आक्रमकता चीन दाखवू शकला व त्याने तिबेट घशात घातले, त्याला लालसेनेच्या पराक्रमापेक्षा भारताचे नेभळट नेतृत्व जबाबदार होते. चिनी फसव्या मैत्रीत गुंतून पडलेल्या नेहरूंनी भारतीय सेना पांगळी ठेवूनच चिनी सेनेला रेल्वेगाडीतली जागा काबीज करावी, तसा तिबेट खाऊ दिला होता. त्यापेक्षा १९६२च्या युद्धाची महत्ता अधिक नाही. पण त्याहीपेक्षा चीनची खरी कसोटी व्हिएतनामस्वतंत्र झाल्यावरच्या संघर्षात लागलेली आहे. त्या इवल्या नवस्वतंत्र देशाला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयास चीनने लालसेनेला पुढे करून केलेला होताच. त्याचे फलित काय होते? अल्पावधीतच लालसेनेला शेपूट घालून व्हिएतनामच्या भूमीतून माघार घ्यावी लागलेली होती. तेव्हा व्हिएतनामदीर्घकालीन युद्धाने उद्ध्वस्त झालेला देश होता आणि सावरलेलाही नव्हता. तरी त्याच्यासमोर लालसेनेला टिकाव धरता आला नाही. अशा लालसेनेचे कौतुक आज चिनी मुत्सद्दी कोणाला सांगत आहेत? व्हिएतनामच्या तुलनेत भारतीय सेना खूप मोठी व सुसज्ज आहे आणि पाकिस्तानच्या कृपेने सतत प्रात्यक्षिकात राहिलेली आहे. तितकी चिनी लालसेना युद्ध वा तत्समपरिस्थितीला सज्ज राहिलेली नाही. पैसा व संख्या अधिक साधने दाखवून व्हिएतनामला झुकवता आले नाही, ते भारतीय सेनेला फक्त हुलकाविण्या देतील; बाकी अधिक काही करू शकणार नाहीत. खरे तर चीनला वेसण घालण्यासाठीच अमेरिका भारताशी दोस्ती वाढवते आहे, त्याच्या चिंतेने चीनला घामफुटला आहे. म्हणून मग सिक्कीमभूतानच्या सीमेवर लपंडाव खेळला जात आहे.

भारताचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी त्याच दुखण्यावर बोट ठेवलेले आहे. ‘‘१९६२ आणि २०१७ यात मोठा फरक आहे,’’ असे जेटली म्हणतात, त्याचा हाच अर्थ आहे. १९६२ इतकी आजची चिनी लालसेना युद्धाला उत्सुक व सज्ज राहिलेली नाही. तेव्हाची लालसेना राजकीय भूमिकेने प्रेरित होती, ती वैचारिक धारणा आता त्यात राहिलेली नाही. चीनमध्ये आज ते क्रांतीच्या पिढीचे नेतृत्व राहिलेले नाही आणि गरिबीत हाल काढण्याचे अनुभव तिथल्या नेतृत्वापाशी नाहीत. गरिबीत गमाविण्यासारखे काही नसते. पण जेव्हा संपत्ती व ऐश्वर्याची साधने गोळा होतात, तेव्हा लढायची हौस कमी होते. नुकसानाची भीती सतावते आणि तडजोडीला प्राधान्य मिळत असते. शक्य तितक्या हुलकाविण्या देऊन व दमदाटीने हेतू साध्य करण्याची मुत्सद्देगिरी त्यातूनच येत असते. चीनची आजची भाषा त्यापेक्षा वेगळी नाही. म्हणूनच तिथल्या मुत्सद्दी मंडळीने १९६२चा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी आल्यावर आणि त्यांनी बांगलादेश युद्ध पुकारल्यावर चिनी नेते आपल्या पाकिस्तानी मित्राच्या मदतीलाही उभे राहिले नव्हते. अशा लोकांनी डरकाळ्या फोडाव्यात. त्यांचा ‘ड्रॅगन’ चित्रात कितीही भयंकर दिसत असला, तरी व्यवहारात त्याच्या नाकातोंडात धूर केला, तर घुसमटू लागणार आहे. ‘ड्रॅगन’चे दिवस पुराणकालीन झाले असून सोयीनुसार, रंग बदलणार्‍या सरड्याने ‘ड्रॅगन’च्या आवेशात बोलणे सोपे असले, तरी आग ओकण्याची कल्पनाही त्याला सोसणारी नसते. ही आजच्या चीनची वस्तुस्थिती आहे. लढाई नको म्हणून संयमाने वागणार्‍या भारताला आव्हान देणे चीनच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही. कारण युद्धाची भीती जितकी भारताला आहे, तितकीच चीनलाही आहे. दोघांना युद्ध नको असेल, तर एकाने हुलकावण्या देऊन काय साध्य होणार आहे? सीमेवर आट्यापाट्या खेळण्यापेक्षा टेबलवर बसून वाटाघाटी शहाणपणाचा मार्ग असतो.­­

 

-भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.