मागल्या दहा-बारा वर्षांत हळूहळू काश्मीरचा कधी पॅलेस्टाईन होऊन गेला, तेच आपल्या लक्षात आलेले नाही. २५ वर्षांपूर्वीचे पॅलेस्टाईनचे फोटो कुठे मिळाले, तर मुद्दामशोधून बारकाईने तपासा. मग त्याची प्रचिती येईल. यापूर्वी निदान काश्मीरमध्ये हुर्रियत व फुटीरवादी निवडणुकीवर बहिष्कार वा अधूनमधून सार्वत्रिक बंदचे आवाहन करीत. पण कुठे लष्करावर हल्ले झाले किंवा दगडफेक झाली, असे प्रसंग चार-पाच वर्षांपूर्वीही आपल्याला बघायला-ऐकायला मिळत नव्हते. पण आजकाल असे प्रसंग वारंवार घडू लागलेले आहेत. त्याची कार्यप्रणाली म्हणूनच तपासून बघता येईल. पॅलेस्टाईनच्या राजकारणात ज्याला चार दशकांपूर्वी ‘इंतेफादा’ असे नाव दिले गेले त्याची ही भारतीय पुनरावृत्ती आहे. म्हणजे असे की, काही पॅलेस्टाईनी शांततेचे नाटक रंगवणार आणि इस्रायलच्या भागात रोजंदारीसाठी जाणार. त्यापैकी कोणी तिथे घातपात करणार. मग त्याला पकडले वा गोळी लागून मारला गेला, तर धुमाकूळ सुरू करायचा. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हे युद्ध छेडले जात असे. म्हणजे असे की, अशा घटना घडल्या, मग बाजूचा लेबेनॉन तोच मुहूर्त साधून इस्रायलवर हल्ले सुरू करायचा. युद्धाची स्थिती निर्माण करायचा. म्हणजे पॅलेस्टाईनचा पश्चिमकिनारा व बाजूच्या अरब राष्ट्राकडून एकाच वेळी इस्रायलच्या सीमेवर हल्ले सुरू व्हायचे. एकीकडे लेबेनॉन सशस्त्र हल्ले करणार आणि पॅलेस्टाईनचे तरुण किरकोळ बॉम्ब वा दगडफेकीने इस्रायली सेनेवर हल्ले करणार. मग जगभरच्या पुरोगामी माध्यमांनी त्याचा हलकल्लोळ करून टाकायचा. पॅलेस्टाईनमध्ये कसे निरपराध नागरिक मारले जात आहेत, त्यावरून मानवतावादी संघटनांनी रान उठवायचे. ही एक ‘मोडस ऑपरेन्डी’ बनून गेलेली होती. आजकाल पाकिस्तानी सेना व काश्मीरमधून फुटीरवादी तशीच काहीशी रणनीती संयुक्तपणे राबवित आहेत. यासंदर्भात ज्यांना अधिक तपशील हवा असेल, त्यांनी इंटरनेटवर ‘इंतेफादा’ शब्दाचा शोध घेऊन तपशील मुद्दामवाचले पाहिजेत. काही फुटीरवादी जिहादी नेमका तोच शब्द काश्मीरमध्येही वापरत असतात. कारण स्पष्ट आहे. आता तिच रणनीती योजनाबद्धरितीने इथेही वापरली जात आहे. मग त्यावरून काहुर माजले की, भारतातले मानवतावादी पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून टुमणे लावणार किंवा काश्मीरमध्ये सैनिकी कारवाईत बळी पडलेल्यांचे उदात्तीकरण करणार आहे. फारुख अब्दुल्ला यांची भाषा व पॅलेस्टाईनचे नंतर अध्यक्ष झालेले यासर अराफत यांची भाषा किती मिळतीजुळती आहे, त्याचाही जिज्ञासूंनी अभ्यास करायला हरकत नाही. आज काश्मीरमध्ये काय चालले आहे, त्याची ओळख ‘इंतेफादा’ समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. ‘इंतेफादा’ ही रणनीती आहे. कुरापत काढायची आणि त्यातून लष्करी कारवाईचा बडगा उगारला, मग अमानुष म्हणून सत्तेच्या विरोधात गळा काढायचा. अशी ही रणनीती आहे. यात प्रत्येक पात्राला त्याची भूमिका ठरवून दिलेली आहे. त्यात दिर्घकाळ जिहादी घातपाताचे कृत्य करण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या यासर अराफत, यांच्याशी इस्रायलने बोलणी केली आणि त्यांच्या पॅलेस्टाईन प्रदेशाला स्वायत्त म्हणून मान्यता दिली. पण अशा स्वायत्ततेला आपले सैन्य उभारण्यास मोकळीक दिलेली नव्हती. आपल्या काश्मीरमध्ये यापेक्षा काहीही वेगळे नाही. पण आपल्यावरचा जिहादी कलंक पुसला गेल्यावर अराफत यांनी, आडोशाने अन्य जिहादी पुढे करून तोच उद्योग चालू ठेवला होता. अराफत त्यात सक्रिय नव्हते. पण जे कोणी घातपात करीत होते, त्या ‘हमास‘ संघटनेच्या हिंसाचाराला पाठीशी घालत, त्याचे उदात्तीकरण अराफतच करीत होते. आज फारुख अब्दुल्ला काय वेगळे करीत आहेत? हा सगळाच संगनमताने चाललेला तमाशा नाही काय?
फरक इतकाच आहे की, इस्रायल अन्य कुठल्या मानवतावादी संघटना वा त्यांच्या जागतिक नेत्यांना दाद देत नाही. हल्ले वा घातपात झाले, मग इस्रायली सेना लगेच प्रतिहल्ला चढवते आणि युद्धपातळीवर परिस्थिती हाताळू लागते. त्यात पॅलेस्टाईन भागातून जिथे कुठे घातपाती अड्डे आहेत, त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागून विध्वंसक प्रतिहल्ला केला जातो. जिथे सैनिकी कारवाईत निदर्शक म्हणून दगडफेके समोर येतात, त्यांना घातपाती ठरवून गोळीबारही केला जातो. त्याचवेळी पॅलेस्टाईनचे नेते म्हणून पोपटपंची करणार्यांनाही आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही, इतका हलकल्लोळ त्याही भागात केला जातो. एकदा तर अराफत यांचे वास्तव्य असलेल्या कम्पाऊंडवरही बॉम्बफेक करण्यात आली होती. काही दिवस त्यांना काळोखात काढावे लागले होते. तिसरी आघाडी लेबेनॉनसारखे शेजारी लढवत असतात. उघडपणे लेबेनॉन कधी इस्रायलशी लढाईत उतरत नाही. पण तिथे ‘हिजबूल‘ नामक जिहादी संघटना आहे, तिच्यामार्फत इस्रायलवर सैनिकी हल्ले केले जातात. आपल्याकडे काश्मीरमध्ये ‘तोयबा‘ वा ‘मुजाहिद्दीन‘ नावाने तसेच हल्ले पाकभूमीत बसलेले पाक सैनिक करीत असतात. हा सगळा प्रकार अगदी लेबेनॉनसारखा आहे. उरी येथे असा हल्ला झाल्यावर आपण त्याला ‘सर्जिकल स्ट्राईक‘ने उत्तर दिले होते. त्याचे आपल्याला मोठेच कौतुक आहे. पण असे प्रतिहल्ले इस्रायल इतके खोलवर करते की, त्यानंतर अनेक महिने लेबेनॉनच्या ‘हिजबूल‘ संघटनेला डोकेही वर काढता येत नाही. हवाई हल्ले व क्षेपणास्त्रे सोडून इस्रायलने अनेकदा लेबेनॉन बेचिराख करून टाकला आहे. त्यात शेकड्यांनी नागरिकही मारले गेले आहेत आणि सैनिक तर त्याहूनही अधिक मारले जातात. असे होऊ लागले, मग जागतिक नेते मध्यस्थी करतात आणि इस्रायलही युद्ध संपल्याची घोषणा करून टाकतो. पण केव्हा?
इस्रायलची ही रणनीती आपण गंभीरपणे अभ्यासली पाहिजे. एकदा असा ‘इंतेफादा’ सुरू झाला, मग इस्रायल सर्व पातळीवर आणि सर्वच आघाड्यांवर युद्धाचा पवित्रा घेऊन टाकते. त्यात जागतिक नेत्यांनी हस्तक्षेप करण्यापर्यंत एक-दोन आठवड्यांचा कालावधी निघून जातो. परिणामअसा होतो की, इस्रायलच्या सीमेपलीकडचा प्रदेश पूर्णपणे होरपळून निघतो. शेकड्यांनी लोक जखमी होतात, तितकेच मारले जातात. हजारो घरे व इमारती जमीनदोस्त होऊन जातात. साहजिकच अशा नागरी वस्तीत आडोसा घेऊन बसलेल्या ‘हिजबूल’ वा अरबी सेनेचा कणा पूर्णपणे मोडून काढला जातो. त्यांनी कष्टपूर्वक उभारलेली गनिमी युद्धाची रचना व सामुग्री अशी उद्ध्वस्त करून टाकली जाते की, इस्रायल कितीही गाफील राहिला तरी पुढले कित्येक महिने कुणाही जिहादीला कुरापत काढणेही अशक्य होऊन जाते. भूकंपातून सावरासावर करावी, तशी त्यांची दुर्दशा होऊन जाते. जिहादी लढवय्ये सोडाच. त्यांचे पालनपोषण करणारी कुटुंबे व वस्त्याही पुरत्या नष्ट होऊन जातात. त्यातून अगोदर नित्यनेमाने जगण्याच्या सुविधा पुन्हा उभारण्याचे कामहाती घ्यावे लागते. नागरी जीवन रुळावर आल्याखेरीज इस्रायलची कुरापत काढण्याचा विचार ‘इंतेफादा’ पुकारलेल्यांच्या मनात येऊ शकत नाही. साहजिकच वर्ष-दीड वर्ष इस्रायलला शांततापूर्ण जीवन जगत येते. मग तो कालावधी उलटला की, पुन्हा पॅलेस्टाईनी व लेबेनॉनच्या ‘हिजबूल’ला लढायची खुमखुमी येते. पुन्हा ‘इंतेफादा’ सुरू होतो. पुन्हा इस्रायल आधीच्याच रणनीतीचा अवलंब करते. हा घटनाक्रमआता जगाच्याही अंगवळणी पडला आहे. हळूहळू भारतालाही काश्मीर व पाकिस्तानातील त्यांच्या पाठीराख्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायली युद्धनीतीचाच अवलंब करावा लागणार आहे. कारण आपण ज्याला आझादीची लढाई समजून बसलो आहोत, तो प्रत्यक्षात काश्मीरमधील पॅलेस्टाईनी ‘इंतेफादा’च आहे.
भाऊ तोरसेकर