सोनियांसमोर ‘मूडीज’ कोण?

    26-Nov-2017   
Total Views |

 
 
 
‘मूडीज’ मॅनेज केला, याचा कोणी कॉंग्रेसवाला पुरावा देऊ शकत नाही. कारण अशा गोष्टींचे कोणी पुरावे ठेवत नसतो. सोनियांना तेव्हा मोदींनी मॅनेज केल्याचाही कुठलाच पुरावा आपल्याला सापडू शकत नाही. पण, आजवर प्रत्येक बाबतीत यश मिळाल्यावर मोदींनी ते मॅनेजच केल्याचा सरसकट आरोप होत असेल, तर ‘मूडीज’ काय सोनिया काय, सगळेच मॅनेज होत असले पाहिजेत. कारण, मोदी हा पुरोगाम्यांच्या दृष्टीने कुठलीही गुणवत्ता वा कुवत नसलेला माणूस आहे. तो केवळ यशाचा आभास निर्माण करतो. त्यासाठी समोर कोणी असेल, त्याला बेधडक मॅनेज करतो.
 
  अमेरिकेहून राहुल गांधी माघारी परतले आणि त्यांचा नूर पालटून गेला आहे. आपली आजवरची प्रतिमा झटकून त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यातच गुजरात विधानसभेच्या निवडणुका लागल्याने त्यांच्या बोलण्याला व शब्दांना धार आलेली आहे. साहजिकच त्यांचे ‘पुरस्कर्ते’ आणि ‘निष्ठावान’ खुशीत आले, तर नवल नाही. मोदी वा भाजपचे असतील यांना ‘भक्त’ म्हटले जाते, तर इंदिराजी वा त्यांच्या कुटुंबीयांच्या भक्तांना ‘निष्ठावान’ म्हणायचा आपल्याकडे प्रघात आहे, तर असे निष्ठावान दीर्घ निद्रेतून बाहेर आले असून, त्यांना आता गुजरात जिंकून राहुल गांधींची अध्यक्षीय यात्रा सुरू होणार असल्याची स्वप्ने पडल्यास गैर नाही. मागल्या वर्षी याच दरम्यान देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश जिंकून राहुल आपली पक्षाध्यक्षीय कारकीर्द सुरू करणार असल्याचे सांगितले जात होते. पण, तिथे मोदींचा दारूण पराभव झाल्यामुळे राहुलना मुहूर्त बदलून घ्यावा लागला. असो, आता गुजरातवर सर्व काही अवलंबून आहे आणि खरेच राहुलनी आपली छाप पाडलेली आहे. त्यांच्या आक्रमकतेने मोदी सरकार भेदरून गेले असल्याचा निर्वाळा खुद्द जाणता राजांनी दिल्यावर आणखी कोणाची साक्ष काढण्याचे कारणच उरलेले नाही. सर्व काही छान चालले असताना या अमेरिकन व जागतिक अर्थसंस्थांनी विचका करून टाकलेला आहे. राहुलनी देशातल्या तमामबुद्धिमंतांना व अर्थशास्त्रज्ञांना देश दिवाळखोर झाल्याचे पटवून दिलेले होते. इतक्यात नाणेनिधी वा जागतिक बॅँक अशा संस्थांनी पाचर मारली व भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे अहवाल बाहेर काढले. ते कमी होते म्हणून काय आता ’मूडीज’ नावाच्या कुणा भुरट्या संस्थेने भारताचे पत मानांकन वाढवून दिलेले आहे. त्यामुळे तमामराहुलनिष्ठांची झोप उडाली तर आश्चर्य नाही ना? हा काय प्रकार आहे, त्याचा शोध घेणे मग अपरिहार्य झाले.

खूप शोध घेतल्यावर अनेक विश्लेषक व अभ्यासक लोकांच्या लक्षात आले की, ‘मूडीज’ हा विकत घेता येणारा माल आहे आणि मोदी पैसा व सत्तेच्या बळावर कोणालाही विकत घेऊ शकतात. साहजिकच आपण ज्या अर्थव्यवस्थेला बुडीत जाहीर केले आहे, ती प्रगतीपथावर असल्याचे ‘मूडीज’ कसे सांगू शकेल? तो सांगत असेल तर त्यालाही मोदींनी विकतच घेतले असणार. अर्थात, असा आरोप भाजपला वा मोदीभक्तांना मान्य होणे शक्य नाही. तेही मग उलटे विरोधकांवर तुटून पडले पण ‘मूडीज’ विकाऊ आहे काय? किंवा आजवर मोदींनी कोणाकोणाला कधी विकत घेतले, त्याचाही शोध घेण्याची गरज वाटलेली नाही. अर्थात त्याची गरज कधीच नव्हती. मोदींच्या विरुद्ध काहीही असले तर त्याच्या पुराव्याची कधी गरज नसते. नुसता आरोप वा शिव्याशापही पुरावेच असतात आणि ज्याक्षणी असे आरोप केले जातात, त्याचक्षणी ते सिद्धही झालेले असतात. मग शोध कसला घ्यायचा? मोदींनी ‘मूडीज’ला खरेदी केले आणि आपल्याला सोयीस्कर असे पत मानांकन मिळवले असल्याचा निष्कर्ष समोर आला. इतरांचा त्यावर विश्वास नसला, तरी मोदी कोणालाही खरेदी करू शकतात, यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे. अगदी आपल्या कडव्या विरोधकालाही खरेदी करण्याची कला वा कुवत मोदींनी आजवर अनेकदा अनेक बाबतीत दाखवलेली आहे. मग त्यांच्या तुलनेत ‘मूडीज’ काय लागून गेलाय? मोदी कोणालाही मॅनेज करतात, याचा सर्वात मोठा पुरावा खुद्द कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच आहेत. ज्यांनी मागल्या दहा-बारा वर्षांत मोदीविरोधात देशव्यापी अपप्रचाराचे अखंड नेतृत्व केले, त्या सोनियासुद्धा मोदी मॅनेज करू शकतात. यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही, पण ते निव्वळ सत्य आहे आणि त्याचा पुरावाही उपलब्ध आहे. मग सोनियाच जर मॅनेज होत असतील, तर ‘मूडीज’चे काय घेऊन बसलात?
 
गुजरात दंगल आठवते? त्या दंगलीचे राजकीय भांडवल करून मोदी व भाजप विरोधात २००२ साली आघाडी उघडली गेलेली होती. त्यावेळी मोदींची संभावना सोनियांनी ’मौतका सौदागर’ अशी केलेली होती. इतक्या टोकाला जाऊन भाषण करताना सोनिया काय सांगत होत्या? मोदी म्हणजे विनाश, मोदी म्हणजे दंगल, मोदी म्हणजे मृत्यूचे तांडव, मोदी म्हणजे अराजक, अशा शेलक्या भाषेत सोनियांनी त्या काळात गुजरातच्या सरकारची निंदा चालवलेली होती. त्याला मोदी अर्थातच राजकीय सभा व प्रचारातून चोख उत्तर देत होते. पण, जाहीर गोष्टी वेगळ्या आणि प्रत्यक्षात तपासून काढलेले निष्कर्ष वेगळे असतात. त्याच काळात देशातल्या प्रत्येक राज्याचे सरकार व त्याच्या कारभाराचे मूल्यमापन राजीव गांधी फाऊंडेशन या संस्थेतर्फे चालले होते. माहिती घेऊन तपास चाललेल्या राज्यांमध्ये गुजरातचाही समावेश होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मोदीच सत्तेत बसलेले होते. त्यांचा कारभार सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशनला कसा वाटला असेल? गृहखाते, सामाजिक न्याय खाते, सामाजकल्याण अशा अनेक कसोट्यांवर देशातल्या अन्य राज्यांपेक्षा गुजरातच आघाडीवर असल्याचा निर्वाळा या फाऊंडेशनने दिलेला होता. सामाजिक सुरक्षेच्या बाबतीतही मोदी सरकारच सर्वो  त्तमअसल्याचा निष्कर्ष या फाऊंडेशनने काढला होता. याला काय परीक्षा म्हणायचे की मॅनेज करणे म्हणायचे? ज्या सोनिया गांधी गुजरातभर मोदी म्हणजे सैतान असल्याची भाषणे देत फिरत होत्या, त्यांच्या अध्यक्षतेखालच्या संस्थेने मोदी सरकार सर्वोत्तमअसल्याचा निष्कर्ष काढणे शक्य होते काय? पण तसे झालेले आहे आणि त्याचेही कारण उघड होते. मोदींनी सोनियांना तेव्हा मॅनेजच केलेले असणार. जो माणूस दहा-बारा वर्षांपूर्वी सोनियांना इतक्या सहजपणे मॅनेज करू शकला, त्याला आज अमेरिकेतील एक पत मानांकन संस्था मॅनेज करणे कितीसे अशक्य असेल?
 
‘मूडीज’ मॅनेज केला, याचा कोणी कॉंग्रेसवाला पुरावा देऊ शकत नाही. कारण अशा गोष्टींचे कोणी पुरावे ठेवत नसतो. सोनियांना तेव्हा मोदींनी मॅनेज केल्याचाही कुठलाच पुरावा आपल्याला सापडू शकत नाही पण आजवर प्रत्येक बाबतीत यश मिळाल्यावर मोदींनी ते मॅनेजच केल्याचा सरसकट आरोप होत असेल, तर ‘मूडीज’ काय सोनिया काय, सगळेच मॅनेज होत असले पाहिजेत. कारण मोदी हा पुरोगाम्यांच्या दृष्टीने कुठलीही गुणवत्ता वा कुवत नसलेला माणूस आहे. तो केवळ यशाचा आभास निर्माण करतो. त्यासाठी समोर कोणी असेल, त्याला बेधडक मॅनेज करतो. ‘मूडीज’पासून अन्य बाबतीत ते शक्य असेल, तर सोनियांच्या राजीव गांधी फाऊंडेशनचा पुरस्कार तसाच मॅनेज केलेला असणार ना? आणि तसेच असेल तर खुद्द सोनियाही मॅनेज होतात असाच अर्थ निघतो ना? असो, विषय तिथेच संपत नाही. नरेंद्र मोदी इतकेच प्रत्येक गोष्ट मॅनेज करू शकत असतील, तर त्यांची घबराट भीतीसुद्धा त्यांनीच मॅनेज केलेली असणार ना? दिल्ली वा बिहारचा पराभवही त्यांनी मोठ्या कुटीलपणाने मॅनेज केलेला असणार ना? फार कशाला राहुल गांधींनाच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आणून बसवणेही मोदींनी मॅनेज केलेले असणार, याविषयी शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही. उद्या गुजरातचा निकाल कसाही लागो, तोही मोदींनी मॅनेजच केलेला असेल. या माणसापाशी मोठी काही जादूची कांडी असावी. तो सर्व काही मॅनेज करू शकतो. मग एकाच गोष्टीचे नवल वाटते की, मूठभर जे असंतुष्ट पत्रकार संपादक बुद्धिमंत बाजूला राहिलेत, त्यांनाच मोदी अजून कसे मॅनेज करू शकलेले नाहीत? बहुधा अशा मूठभरांना कायमआपल्या विरोधात शिव्याशाप देण्यासाठी मोदींनीच मॅनेज केलेले असू शकते. काही सांगता येत नाही, या माणसाविषयी. तो नोटांमध्ये चीप घालू शकतो, तर माध्यमे व बुद्धिवाद्यांत आपले पित्ते शिव्या घालायला का घुसवणार नाही?
 
-भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.